खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी फौजदारी होणार
By Admin | Published: September 6, 2015 12:03 AM2015-09-06T00:03:12+5:302015-09-06T00:03:12+5:30
स्थानिक महापालिकेच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी दाखल होणार आहे.
आयुक्तांचे आदेश : दोन महिन्यांच्या चौकशीनंतर निर्णय
अमरावती : स्थानिक महापालिकेच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी दाखल होणार आहे. बनावट करारनामे करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकूण ४० जणांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल हे मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.
खत्री कॉम्प्लेक्स हे महापालिकेने बीओटी तत्वावर साकारले असून बिल्डर्ससोबत १८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत करारनामा होता. मात्र, गंगाप्रसाद जयस्वाल यांनी सुनील खत्री, छुगाराम त्रिकोटी व अनुप खत्री या बिल्डर्ससोबत परस्पर करारनामा करुन एक रुपया फूटप्रमाणे हे संकूल करारनाम्याला मुदतवाढ दिली. या करारनाम्याला प्रशासनाची कोेणतीही परवानगी नव्हती. तरीरदेखील जयस्वाल यांनी महापालिकेला अंधारात ठेवून पुढील सन २०२० पर्यंत या करारनाम्याला मुदतवाढ दिली. बनावट करारनामे करताना जयस्वाल यांनी उपनिबंधक कार्यालयातून प्रतिज्ञापत्रदेखील लिहून दिले, हे विशेष.
या संकुलात १८३ गाळे धारक असून पहिल्या टप्प्यात ४० गाळे धारकांचे बनावट करारनामे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. परस्पर करारनामे ते देखील बनावट ही बाब अतीशय गंभीररीत्या प्रशासनाने घेतली आहे. दोन महिन्यांच्या चौकशीअंती कायदेशीर बाबी तपासून यात फौजदारी दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतला आहे.