मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे
By admin | Published: March 1, 2016 12:14 AM2016-03-01T00:14:00+5:302016-03-01T00:14:00+5:30
मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे.
श्रीपाल सबनीस : विद्यापीठात मराठी राजभाषा दिन उत्साहात
अमरावती : मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखकांनी साहित्याची निर्मिती करताना त्याचे भान ठेवावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात 'मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ, मराठी विभागप्रमुख तथा वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मनोज तायडे, हेमंत खडके उपस्थित होते.
मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समोर नेमके कुठले प्रश्न आहेत, हे लक्षात घेऊन मराठी प्रतिभासंपन्न कशी होईल, यासाठी उद्योन्मुख साहित्यकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकीय लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न न होता सामाजिक व आर्थिक लोकशाही टिकवण्याचीसुद्धा गरज आहे. यादृष्टीने मराठी साहित्यकांनी विचार करावा, असे सबनीस यांनी सांगितले. शोधनिबंध व संशोधनाच्या माध्यमातून मराठी भाषा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी आणि विद्वानांनी नेहमी जागृत राहून कार्य करावे, असे सपकाळ यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रथम आल्याबद्दल व सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल मराठी विभागाची विद्यार्थिनी शीतल सुरेंद्र तायवाडे हिचा, बार्टीतर्फे मनोज तायडे यांचे पुस्तक पुनर्मुद्रित केल्याबद्दल सत्कार झाला. प्रास्तविक मनोज तायडे यांनी, संचालक हेमंत खडके व आभार प्रणव कोलते यांनी मानले. कार्यक्रमाला सबनीस, सतीश तराळ, सोनपेठकर, बी.जी. खोब्रागडे, कुमार बोबडे, शरद जोध, अण्णा वैद्य, वैशाली गुडधे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.