मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने गाठला चार तपांचा प्रवास
By admin | Published: February 22, 2016 12:50 AM2016-02-22T00:50:53+5:302016-02-22T00:50:53+5:30
देशात पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक आहे.
१४ गावांचे पुनर्वसन : वाघांची संख्या वाढीस लावली
अमरावती : देशात पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना होऊन ४२ वषर््े लोटले आहे. १४ गावांचे यशस्वी पुनर्वसन, ६० पेक्षा जास्त वाघांचे संरक्षण, वनसंपदेचे जतन तर राज्यात मूल्यांकनात अव्वल येण्याचा बहुमान पटकावित मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने चार तपाचा प्रवास केला आहे.
२२ फेब्रुवारी १९७४ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र सुमारे २७६८.५२ चौरस कि.मी. आहे. सातपुडा मायकेल पर्वत रांजीतील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वनांची संलग्नता दर्शविणारे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे. व्याघ्र प्रकल्पात खाद्य व पाण्यामुळे वाघांची संख्या वाढीस लागल्याची नोंद आहे. २२ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलात ११२ पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. या दलात सहायक वनसरंक्षक दर्जाचा एक प्रमुख अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ ३ वनपरिक्ष्यत्र अधिकारी, ८१ वनरक्षक व २७ वननिरीक्षक असे एकू ण ११२ पदे निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याअनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक सहायक वनसंरक्षक, दोन वनपरिक्षेत्र अधिकारी रुजू झाले आहेत. ६६ नवरक्षक व २२ वननिरीक्षक रुजू झाले आहेत. या पदाच्या आस्थपनेवर होणारा खर्च १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागविला जात आहे. व्याघ्र प्रकल्पात विविध नावीण्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना, ग्राम परिसर विकास समिती, सिलेज आदी योजना राबविल्या जात आहे. देशात पहिल्यांदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत या सेलने देशभरातून ५० पेक्षा जास्त तस्करांना अटक केली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गौरविले
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने १४ गावांचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांच्यातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या मुल्याकंनानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने देशात सहावा, मध्य भारतात दुसरा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय पर्यारवण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांना २० जानेवारी सन्मानित केले आहे.
सोमवारी ४२ वा स्थापना दिवस
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा ४२ वा स्थापना दिन सोमवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संचालनालयाच्या ‘कुलाढाप’ सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विशेष उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड हे राहतील, अशी माहिती क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी दिली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव होईल.