मिनीमंत्रालय : ६५

By admin | Published: February 22, 2017 12:05 AM2017-02-22T00:05:53+5:302017-02-22T00:05:53+5:30

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ७८७ केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

Ministries: 65 | मिनीमंत्रालय : ६५

मिनीमंत्रालय : ६५

Next

उशिरापर्यंत रांगा : चांदूरबाजार तालुका सर्वाधिक ६८.०३
अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ७८७ केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सायंकाळी उशीरापर्यंत १०१ मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सर्वाधिक ६८.०३ टक्के मतदान चांदूरबाजार तालुक्यात तर सर्वात कमी ६० टक्के मतदान भातकुली तालुक्यात झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
यंदा जिल्हा परिषदेसाठी ४१७ व पंचायत समितीसाठी ५३३ असे एकूण ९५० उमेदवार रिंगणात होते. युती व आघाडीत ताटातूट झाल्यावर सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली. यामुळे एकेका मतांसाठी संघर्ष होऊन मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अंतिम टक्केवारीनुसार ६५ टक्केच मतदान झाले. प्रचारासाठी सहा दिवस एवढा अल्प अवधी व ग्रामीण भागात तूर व हरभरा सोंगणीचा सुरू असलेला हंगाम आदी कारणांमुळे मतदानाचा टक्का माघारला. तथापि युवा मतदारांनी यावेळी उत्साहाने मतदान केले. मंगळवारी मतदानाच्या पहिल्या दोन तासात केवळ ६.३३ टक्के मतदान झाले. यामध्ये ६३ हजार २१४ पुरूष व २४ हजार ७७३ महिला असे एकूण ८७ हजार ९८७ मतदान झाले.

१०१ मतदार केंद्रावर उशिरापर्यंत रांगा
जिल्ह्यात एक हजार ७८७ मतदान केंद्र आहे. यापैकी एक हजार ६८६ मतदान केंद्रावर अंतिम अवधीपर्यंत म्हणजेच सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान आटोपले. मात्र १०१ मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. या ठिकाणी सायंकाळी ७ पर्यंत मतदान करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.

कठोरा (जामठी) येथे बोगस मतदान
नांदगाव पेठनजीकच्या असलेल्या कठोरा (जामठी) येथील मतदान केंद्रावर एका महिला मतदाराच्या नावे आधीच मतदान करण्यात आल्याचा प्रकार घडला. याविषयीची तक्रार घेण्यास केंद्राध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जवंजाळ यांनी केला. त्या महिला मतदारास नंतर प्रदत्त मतपत्रिका देण्यात आली.

अशी आहे तालुकानिहाय टक्केवारी
जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. यामध्ये चांदूररेल्वे ६५.१४, चांदूरबाजार ६८.०३, मोर्शी ६५, वरुड ६७.६५, तिवसा ६२.९८, अमरावती ६२, अचलपूर ६७.०५, धारणी ६५, अंजनगाव सुर्जी ६७.२५, दर्यापूर ६४.७१, भातकुली ६०, चांदूररेल्वे ६२.३५, धामणगाव ६३.७१ व नांदगाव तालुक्यात ६५.३३ टक्के मतदान झाले.

उमेदवारांच्या गावात मतांचा टक्का वाढला
गण-गटातील उमेदवारांच्या गावात मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी अधिक होती. तिवसा तालुक्यात वरखेड, तळेगाव ठाकूर, वऱ्हा व कुऱ्हा गावातील उमेदवार रिंगणात होते. या गावांमध्ये ७२ ते ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली.

युवा मतदार; दिव्यांगांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता. महाविद्यालयात झालेल्या ‘स्विप’ उपक्रमांतर्गत जनजागृतीमुळेही मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. दिव्यांगांसाठी मतदानकेंद्रात प्राधान्याने मतदानाची सोय करण्यात आली होती. अपवाद वगळता स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदानास सहकार्य केले.

Web Title: Ministries: 65

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.