नागपूर-औरंगाबाद महामार्ग चार तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 08:36 PM2022-08-11T20:36:00+5:302022-08-11T20:36:26+5:30

Amravati News गुरुवारी नागपूर-औरंगाबाद महामार्ग बोरगाव धांदे-भातकुली या टप्प्यात चार तास बंद होता.

Nagpur-Aurangabad highway closed for four hours | नागपूर-औरंगाबाद महामार्ग चार तास बंद

नागपूर-औरंगाबाद महामार्ग चार तास बंद

googlenewsNext

अमरावती : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी नागपूर-औरंगाबाद महामार्ग बोरगाव धांदे-भातकुली या टप्प्यात चार तास बंद होता. तालुक्यातील बगाजी सागर धरणाचे पाणी सोडल्यामुळे बारा गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद आतापर्यंत धामणगाव रेल्वे तालुक्यात झाली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या तालुक्यात पूरस्थिती कायम आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्पाचे दरवाजे बुधवारी २६० सेंटिमीटरने उघडण्यात आले. त्यानंतर गुरुवारी बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे १०० सें.मी.पर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील १२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. बोरगाव धांदे-भातकुली या मार्गावर असलेल्या निचोड नाल्याला पूर आल्यामुळे औरंगाबाद-नागपूर हा महामार्ग तब्बल चार तास बंद होता.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात २४०० वर घरांची पडझड

भंडारा/ गोंदिया : दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २४०० वर घरांची पडझड झाली असून, भंडारा जिल्ह्यातील ३८ मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र दाणादाण उडाली असून, अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. पुराचा २५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. २०० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

गत २४ तासांत १९.७ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसाने बुधवारी रात्रीपासून उसंत घेतल्याने सर्वांना माेठा दिलासा मिळाला. मात्र, दाेन दिवस झालेल्या पावसात जिल्ह्यातील ८७० घरांची पडझड झाली, तर जनावरांचे ६६ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार ७८० हेक्टर क्षेत्रापैकी अतिवृष्टीचा फटका ४५५ गावांतील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान धान पिकाचे झाले आहे.

नदीनाल्याचे पाणी वस्तीत शिरल्याने जिल्ह्यातील २०० वर कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. सर्वाधिक माेहाडी तालुक्यातील ९७ कुटुंबांचा समावेश आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग बंद असून, गुरुवारी ३८ मार्ग बंद पडले हाेते. दरम्यान, वैनगंगेने धाेक्याची पातळी बुधवारी रात्री ओलांडली हाेती. गुरुवारी दुपारनंतर पूर ओसरायला लागला. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

गोंदिया जिल्ह्यात दीड हजारावर घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांतील दहा ते बारा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले, तर अनेक नाल्यांच्या पुलावरून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पाणी वाहत होते. त्यामुळे दहा ते बारा मार्ग बंद होते. पुरामुळे हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने ती सडण्याची शक्यता बळावली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे नवेगावबांध, बोदलकसा जलाशय ओव्हर फ्लो झाले, तर पुजारीटोला, कालीसरार, संजय सरोवर या धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे.

वैनगंगेला पूर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद आहेत. त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

गुरुवारी पावसाने उसंत घेतली. मात्र, इटियाडाेह व संजय सराेवराचे पाणी साेडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे तिच्या उपनद्यांना दाब येऊन जिल्ह्याच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे गडचिराेली-मूल हा मार्ग वगळता सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची माेठी अडचण झाली आहे. शेकडाे हेक्टर शेतात पाणी शिरले आहे.

११ भंडारा- भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनीत बुधवारी सकाळी वैनगंगेच्या पुराचे पाणी शिरले होते.

Web Title: Nagpur-Aurangabad highway closed for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर