नापिकीने ७ महिन्यांत १८५ शेतकरी आत्महत्या
By admin | Published: September 11, 2015 12:27 AM2015-09-11T00:27:37+5:302015-09-11T00:27:37+5:30
जिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.
धक्कादायक अहवाल : ६५ युवा शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्युला
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात नापिकीमुळे जानेवारी ते १५ जुलै २०१५ दरम्यान १८५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १८ ते ४० वयोगटातील ६५ युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक अहवाल आहे. थकीत कर्जामुळे ६४ शेतकऱ्यांनी मृत्युचा फास जवळ केला आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ दरम्यान १९५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले. यंदाच्या जुलै महिन्यात सर्वाधिक ३६ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १९, एप्रिलमध्ये २३, मे महिन्यात २९ व जूनमध्ये २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यंदा कोरडवाहू क्षेत्रात पीक न झाल्याने ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यापैकी ४८ आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. कालव्याअभावी ३, बोअर अभावी ३ व सिंचनासाठी विहिरी नसल्यामुळे ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पैकी २६ प्रकरणे पात्र ठरली आहेत. कौटुंबिक कलहामुळे ४ शेतकऱ्यांनी, खासगी कर्जामुळे १, आजारपणामुळे ५ व इतर कारणांमुळे ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ही सर्व प्रकरणे अपात्र ठरली.