घरातील एकाच व्यक्तीला मिळणार पीएम किसानचे पैसे; बाकीच्यांचा पत्ता होणार कट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:45 IST2025-01-18T14:44:51+5:302025-01-18T14:45:30+5:30
पीएम किसान योजना : अन्य सदस्यांचा पत्ता होणार कट केंद्र शासनाची नियमावली

Only one person in the family will get PM Kisan money; the rest will be identified!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये घरातील शेती कुटुंबातील अनेकांच्या नावे असल्याने त्या सदस्यांना लाभ मिळतो. यामध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी आदी या योजनेचा लाभ घेतात. आता या योजनेसाठी केंद्र शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेतल्यास फक्त एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर २०१८ पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातही २.७८ लाख शेतकऱ्यांना १८ व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला योजनेत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, या योजनेत अपात्र शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आल्यात आल्याने ई-केवायसी व आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आलेली आहे.
अर्ज करताय?
पत्नी, मुलांचे द्या आधार योजनेत पती, पत्नी आणि मुले आधार कार्ड जोडावे लागणार आहे. वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
१९ वा हप्ता कधी?
१९ वा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये वितरित केला जाणार आहे. याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकरी नोकरदार किंवा संस्थांचे पदाधिकारी आहे व आयकराचा भरणा करीत असल्यास लाभ मिळणार नाही.
२०१९ पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ
लाभर्थीच्या नावावर सन २०१९ पूर्वी जमिनीची नोंद आवश्यक आहे. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीची वारसा हक्काची जमीन नोंद असल्यास त्या व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे.
तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी?
यानंतर पीएम किसान योजनेत कुटुंबातील अनेक व्यक्तींना योजनेचा लाभ मिळाला आहे. आता मात्र योजनेसाठी नवीन नियम आले आहेत. त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
"पीएल किसान योजनेच्या निकषात केंद्र शासनाने काही बदल केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना आता माहिती द्यावी लागेल, शिवाय केवायसी केली नसल्यास त्वरित करावी."
- राहुल सातपुते, एसएओ.