पालक म्हणतात, शिक्षकांनो पैसे परत द्या
By admin | Published: September 9, 2015 12:14 AM2015-09-09T00:14:42+5:302015-09-09T00:14:42+5:30
शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांनी नोकरीत असलेले शिक्षक आणि प्राध्यापक खासगी शिकवणीवर्ग घेत असेल त्यांचेवर धाडी टाकून कारवाई करण्यात येईल, ...
शिकवणी वर्गाबाबत रोष : अभ्यासक्रम शाळेतच पूर्ण करा
संदीप मानकर दर्यापूर
शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांनी नोकरीत असलेले शिक्षक आणि प्राध्यापक खासगी शिकवणीवर्ग घेत असेल त्यांचेवर धाडी टाकून कारवाई करण्यात येईल, असे आदेश सोडताच शिकवणीवर्ग घेणाऱ्यांचे धाबे दणाणले. अनेकांनी शिकवणीवर्ग बंद केले आहे. परंतु काही प्राध्यापक अजूनही राजरोसपणे शिकवणी वर्ग घेत आहेत. नोकरीत असलेल्या प्राध्यापकांकडे जे विद्यार्थी आहे त्यांचे शिकवणी वर्ग बंद झाल्याने गरीब पालकांमध्येही खळबळ उडाली आहे. शिकवणी वर्गासाठी त्यांनी जे पैसे दिले आहे ते पैसे पालकवर्ग अशा प्राध्यापकांना परत मागत आहेत. अन्यथा आमच्या पाल्यांचा अभ्यासक्रम शाळेतच पूर्ण करून द्या, अशी त्यांची मागणी केली आहे.
शहरात अनेक दिवसांपासून काही प्राध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यादानाच्या नावावर पैसे कमविण्याच्या हव्यासोपोटी शिकवणी वर्गाच्या नावावर खासगी दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. याला बेरोजगार शिक्षकांचा विरोध आहे. 'लोकमत'चे वृत्त झळकताच येथील एका नामांकित शाळेच्या गणित, रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकांनी स्वयंस्फूर्तीने खासगी शिकवणीवर्ग बंद ठेवले आहे. त्यानंतर पुन्हा वृत्त प्रकाशित होताच व शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश देताच भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाचे धाबे दणाणले आहे. त्यांनीही २ सप्टेंबरपासून शिकवणीवर्ग बंद ठेवल्याचे कळते. परंतु येथील अमरावती मार्गावरील एमसीव्हीसी (व्होकेशनल) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले एका दबंग प्राध्यापकाने सर्व नियम धाब्यावर बसवून बसस्थानक चौकात असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आपली दुकानदारी राजरोसपणे थाटली आहे. शिक्षण विभागाच्या नाकावर टिचून हा प्राध्यापक केवळ पैसे कमविण्याच्या हेतुने पालकांची तसेच विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे बारावीचे वर्ष आहे व ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी अशा प्राध्यापकांना शिकवणी वर्गाचे शुल्क दिले आहे. ते पालक पेचात सापडले आहेत.
पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक
पालकांनी, पाल्यांच्या शिकवणीवर्ग अशा प्राध्यापकांकडे लावल्यास आपल्याला नियमाने शिकवणीवर्ग घेता येत नाही, हे त्यांना सांगण्यात आले नाही. सर्व नियम आधीपासूनच प्राध्यापकांना माहिती असतानाही त्यांनी पालकांची फसवणूक केल्यामुळे ज्या गरीब पालकांनी परिस्थिती नसतानाही भरमसाठ शुल्क या प्राध्यापकांकडे भरले ते पालक या प्राध्यापकांना पैसे परत मागत आहेत. पैसे न दिल्यास चार महिने विद्यार्थ्यांच्या परीक्षेला राहिले असताना जो अभ्यासक्रम राहिला असेल तो त्यांनी शाळेत पूर्ण करुन द्यावा, अशी मागणी केली आहे.