खुल्या जागेच्या संवर्धनाचा प्रश्न
By admin | Published: September 12, 2015 12:16 AM2015-09-12T00:16:34+5:302015-09-12T00:16:34+5:30
महापालिकेच्या दस्तूरनगर प्रभाग क्र.३३ मध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या प्रभागात विकासाचे प्रश्न मार्गी लागले असले तरी...
अमरावती : महापालिकेच्या दस्तूरनगर प्रभाग क्र.३३ मध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या प्रभागात विकासाचे प्रश्न मार्गी लागले असले तरी अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. प्रभागातील दोन ते तीन उद्याने वगळता वैभव कॉलनीसह काही भागांत अविकसित उद्याने आहेत. त्यांचा कायापालट करण्याची आवश्यकता आहे. काही भागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट नाल्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. प्रभागात महापालिकेची शाळा नाही. फरशी स्टॉप ते शिव इंग्लिश शाळेपर्यंतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा रखडलेला
आहे. चौकातील वाहतूक सिग्नल सुरू करण्याचीही नितांत गरज आहे.
कंटेनर रिकामे, कचरा जमिनीवर
महापालिकेने विविध भागांत केरकचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवले आहेत. मात्र, नागरिक घराघरातील कचरा कंटेनरमध्ये न टाकता जमिनीवरच टाकतात. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. नागरिकांना कचरा टाकण्याची सोय व्हावी, यासाठीच महापालिकेने कंटेनर ठेवले आहेत. तेव्हा नागरिकांनी कचरा कंटेनरमध्येच टाकण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरून घाण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. कचरा कंटेनरचा पुरेपूर वापर व्हावा, यादृष्टीने महापालिकेने तातडीने नियोजन केल्यास स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
खुल्या जागेचा व्हावा विकास
महापालिकेच्या हद्दीतील दस्तुरनगर प्रभाग क्र. ३३ मध्ये व्यंकटेश व महालक्ष्मी कॉलनीत महापालिकेच्या माध्यमातून तसेच अन्य दोन उद्यानांचा सर्वसमावेशक विकास झाला आहे. याच धर्तीवर प्रभागातील महापालिकेच्या खुल्या रिकाम्या जागेवर उद्याने साकारण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत. विविध नगर, कॉलनीतील मैदानांचे नियोजन करून सर्व सोयीयुक्त उद्याने तयार करता येऊ शकतात.
सर्विस गल्ल्यांमध्ये अस्वच्छता
प्रभागात विकासकामे बऱ्यापैकी झाली आहेत. परंतु काही ठिकाणी समस्या कायमच आहेत. सर्विस गल्ल्यांची स्वच्छता नियमितपणे होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्याववरून वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा व डासांचा त्रास सहन करावा लागतो. नाल्यांच्या काठावरील घाण व केरकचरा वेळेत न उचलल्यास तो नालीत पडून नाल्या बुजतात. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थितरीत्या वाहून जात नाही. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे.
नाल्याला संरक्षण भिंतीची प्रतीक्षा
दस्तुरनगर प्रभागातील नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने नाल्याच्या काठालगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना डासांचा प्रकोप व तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे फरशी स्टॉप ते शिव इंग्लिश शाळेपासून वाहणाऱ्या या नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनिधींचा सतत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, संरक्षण भिंतीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. नाल्याच्या पाण्यापासून उद्भवणारी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता नाल्याला संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडूून होणाऱ्या पाठपुराव्याची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांसाठी ते सोयीचे होईल.