नांदगाव एमआयडीसी परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:34+5:302021-06-04T04:10:34+5:30
अमरावती : जिल्ह्यात नांदगावपेठनजीकच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे बाधित शेत जमिनीच्या भरपाई व जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली निघणार ...
अमरावती : जिल्ह्यात नांदगावपेठनजीकच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे बाधित शेत जमिनीच्या भरपाई व जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली निघणार आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बैठकीद्वारे केलेल्या चर्चेत जमीन अधिग्रहणाबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश गुरुवारी पालकमंत्र्यांनी दिले.
अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे नांदगावपेठ शिवारातील सुमारे ५५ हेक्टर शेती क्षेत्र बाधित होत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार होती. त्याची दखल घेऊन ना. ठाकूर यांनी मुंबई येथे बैठक घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नांदगावपेठ येथील पं. स. सदस्य बाळासाहेब देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ बोडखे, बाधित क्षेत्राच्या जमीनीबाबत सुरुवातीपासून सातत्याने प्रश्न मांडणारे ज्ञानेश्वर बारस्कर यावेळी उपस्थित होते. जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. हा प्रश्न एका आठवड्यात निकाली काढण्यात येईल, असे सीईओ अनबलगन यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
विदेशी गुंतवणुकीसाठी विशेष कार्यक्रम
औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगांत होणाऱ्या भरतीत स्थानिक बांधवांना प्राधान्याने रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करावेत. अमरावती क्षेत्रातील औद्योगिक विकासाची शक्यता पाहता नव्या देशी- विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याकरिता विशेष कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
बॉक्स
ज्या गावांतील भूसंपादनाचे प्रश्न निकाली
मौजे पिंपळविहीर, डिगरगव्हाण, कापूसतळणी, डवरगाव, माळेगाव, चिंचखेड, केकतपूर व वाघोली या गावांतील भूसंपादनाबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. औद्योगिक क्षेत्र परिसरातील भूसंपादन, नुकसान भरपाईप्रकरणी तातडीने निकाली काढण्यात येतील. तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी होताच रोजगार मेळावे घेण्यात येतील, असे अनबलगन यांनी सांगितले.