उन्हाच्या तडाख्याने रस्ते ओस
By admin | Published: September 10, 2015 12:08 AM2015-09-10T00:08:33+5:302015-09-10T00:09:17+5:30
पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत.
आजार बळावले : शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले
अमरावती : पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत. गत आठवडाभरापासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र, मंगळवारी उन्हाचा तडाखा वाढल्याचे जाणवले. प्रखर उन्हामुळे भर दिवसा रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
बुधवार सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी १२ नंतर उन्हाची दाहकता वाढत जाते. वाढत्या उन्हामुळे वर्दळीचे रस्तेही ओस पडल्याचे दिसून येते. उन्हाच्या काहिलीपासून रक्षण करण्याकरिता दुपट्टे आणि स्टोल्सचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर विविध कारणांसाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. प्रचंड उकाड्याने आबालवृध्द हैराण झाले आहेत.
कडाक्याच्या उन्हामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. कशीबशी हाताशी उरलेली पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर वाढत्या उन्हाचा विपरित परिणाम जाणवू लागला आहे. सोयाबीन ऐन फुलावर आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने शेंगा पोचट राहण्याची शक्यता अधिक आहे. भर पावसाळ्यात पिकांना सिंचनाचे पाणी द्यावे लागत आहे. वातावरणातील अनपेक्षित बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे.
तीव्र उन्हामुळे डोकेदुखी, डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातील कडक ऊन नागरिकांची अक्षरश: परीक्षा घेत आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी उपयायोजना करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)