समाजकल्याण समिती सभेतून प्रतिनिधींना काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:20 PM2018-09-28T22:20:10+5:302018-09-28T22:20:34+5:30
विस्तार अधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या प्रतिनिधींना समाजकल्याण समितीच्या सभेतून बाहेर काढण्यात आले. यावेळी सदस्य आक्रमक झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विस्तार अधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या प्रतिनिधींना समाजकल्याण समितीच्या सभेतून बाहेर काढण्यात आले. यावेळी सदस्य आक्रमक झाले होते.
जिल्हा परिषद समाजकल्याण विषय समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती सुशीला कुकडे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या सभेला १४ पंचायत समित्यांपैकी सहा ठिकाणच्या विस्तार अधिकाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित होते. यातील काहींनी आपला प्रतिनिधी पाठवून वेळ निभावून नेला. मात्र, सभेला अधिकाऱ्यांऐवजी प्रतिनिधी कसे, या मुद्द्यावर समितीचे सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे समाजकल्याण अधिकारी चेतन जाधव यांनी सभेला आलेल्या प्रतिनिधींना फर्मान सोडले आणि त्या आलेल्या प्रतिनिधीनी सभेतून काढता पाय घेतला.
सभा सुरू होताच कोणते अधिकारी उपस्थित नाहीत, असा प्रश्न सदस्य प्रवीण तायडे, शरद मोहोड यांनी केला. यावेळी नांदगाव खंडेश्वर, धारणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, वरूड, चिखलदरा या पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पाठविले होते, तर दोन पंचायत समित्यांचे कुणीही हजर नव्हते. त्यामुळे सदस्य संप्तत झालेत. प्रतिनिधींना सभेला जाण्याबाबत लेखी आदेश नव्हते; केवळ मौखीक आदेशावर ते आले होते. अशा सर्वाना सभेतून बाहेर जाण्यास समाजकल्याण अधिकारी चेतन जाधव यांनी सूचना केली. सभेला उपाअध्यक्ष दत्ता ढोमणे, प्रवीण तायडे, शरद मोहोड, देवेंद्र पेठकर, शारदा पवार, सीमा सोरगे, रंजना गवई, अनिता अडमाते, अर्चना वेरूळकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन जाधव, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.
तीन वर्षांपासून साहित्य वापट नाही
समाज कल्याण विभागामार्फत सन २०१५-१६ या वर्षातील पंचायत समित्यांना पुरविण्यात आलेला साहित्य अद्याप पडून आहे. हा प्रकार सदस्य शरद मोहोड, प्रवीण तायडे व अन्य सदस्यांनी सभेत आक्रमकपणे मांडला. नांदगाव खंडेश्वर, भातकुली पंचायत समितीमध्ये शिलाई मशीन, पीव्हीसी पाइप, अन्य ३५ साहित्य पडून आहे. मात्र, यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे साहित्यवाटपात दिरंगाई करणाºयावर कारवाईची मागणी सदस्यांनी रेटून धरली. अखेर यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिले.