सोयाबीन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे

By Admin | Published: June 25, 2017 12:10 AM2017-06-25T00:10:13+5:302017-06-25T00:10:13+5:30

जिल्ह्यात यंदा सरासरी क्षेत्राच्या ४० टक्के म्हणजेच दोन लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होणार आहे.

Soybean planting technology is important | सोयाबीन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे

googlenewsNext

कृषीतज्ज्ञांचा सल्ला : बियाण्यांची काळजी हवी, पट्टापेर पद्धती योग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात यंदा सरासरी क्षेत्राच्या ४० टक्के म्हणजेच दोन लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होणार आहे. बियाणे बाजारातील असो किंवा घरचे, पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बियाणे अधिक खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी किंवा पेरणीनंतर पावसाचा खंड, योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होऊ शकते. यासाठी पेरणी करताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
सोयाबीनसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीची निवड करावी. हलक्या, उथळ व क्षारयुक्त जमिनीत सोयाबीनची पेरणी करू नये. सलग १० वर्षांपासुूा एकाच क्षेत्रात व एकाच वाणाचा उपयोग केल्यामुळे कीड व रोगांचा प्रकोप वाढतो व सोयाबीन पिकाची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
सोयाबीनसह मूग, उडीद या पिकांची बैलजोडीने पेरणी करावयाची झाल्यास तीनदाती तिफन अथवा काकरीने पेरणी करावी. प्रत्येक वेळी परत येताना चौथी ओळ रिकामी ठेवावी व या ओळीत डवरणीच्या वेळी किंवा डवरणी झाल्यावर लगेच गाळ पाडून घ्यावा. प्रत्येक तीन ओळीमधून पीक गादीवाफ्यावर करून घ्यावे. टॅक्टरद्वारे पेरणी करावयाची झाल्यास सात दात्यांच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करावी. मात्र, पेरणी यंत्राच्या बियाण्यांच्या कप्प्यातील चवथे छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना एक ओळ रिकामी ठेवावी (आठवी ओळ) प्रत्येक चौथ्या ओळीवर डवरणीच्या वेळी किंवा डवरणी आटोपल्यानंतर एका डवराच्या सहाय्याने गाळ ओढून पट्टापेर पद्धतीने पीक गादी वाफ्यावर घ्यावे.
पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी व टॅग जपून ठेवावे. साधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी. जमिनीत योग्य ओलावा आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता शेतातील मातीचा गोळा करावा तो घट्ट होतो किंवा नाही हे पाहावे व लगेच दूर फेकावा, गोळा फुटल्यास जमीन पेरणीयोग्य नाही, असे समजावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.
पट्टापेरचे तोटेही : प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवल्याने २५ टक्के ओळीचे प्रमाण कमी होते. म्हणजेच २५ टक्के झाडांची संख्या कमी होते. खाली ठेवलेल्या चौथ्या ओळीच्या ठिकाणी गाळ न पाडल्यास त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव वाढतो.

पट्टापेर पद्धतीचे फायदे
बियाण्यांचे प्रमाण कमी लागते. बियाणे खर्चात बचत होते. पेरणी लवकर व सोईची होते. शेतात वेळोवेळी फेरफटका मारणे सोईचे होते.किडी रोगाची निगराणी व निरीक्षण शक्य होते. प्रत्येक पट्ट्यात फवारणीयोग्य रितीने करता येते. शेतात हवा खेळती राहते. सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा कमी होते. सरींच्याव्दारे ओलीत करता येते. तुषार सिंचन करणे सोईचे होते. काठावरील ओळींना बॉर्डर ईफेक्ट मिळतो. पावसाच्या पाण्याचे मूळस्थानी संर्वधन शक्य होते. प्रत्येक पट्ट्यात पिकाचे काटेकोर व्यवस्थापन करता येते. पिकाची एकसमान वाढ होते. पीक गादीवाफ्यावर असल्यामुळे पावसाचे पाणी व पीक याचा सरळ संबंध टाळता येतो.

अशी करावी बीज प्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यास २ ते ३ ग्रम कार्बोक्सिन ३७.५ व थायरम ३७.५ टक्के मिश्र घटक या प्रमाणात लावावे. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर रायझोबियम जपोनिकम स्फूरद विरघळणारे जिवाणू पीएसबी २५ ग्रम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे व नंतर पेरणी करावी.पेरणी सरत्याने करावी दोन ओळीतील किंवा दोन रोपातील अंतर ४५ बाय ५ सेमी ठेवावे.अधीक उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाखापर्यत ठेवावी. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी.

Web Title: Soybean planting technology is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.