बाजार समितीत प्रचाराला वेग
By Admin | Published: September 8, 2015 12:19 AM2015-09-08T00:19:06+5:302015-09-08T00:19:06+5:30
जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली अमरावती, भातकुली बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे.
तीन पॅनेलमध्ये चुरस : राजकारण बाजूला ठेवून नेते एकत्र
अमरावती : जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली अमरावती, भातकुली बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजुला ठेवून स्थानिक नेत्यांनी बाजार समिती डोळ्यासमोर ठेवून मनोमिलन केले आहे. एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता प्रचारात एकत्र फिरु लागले आहेत. गटातील समर्थक कसे निवडून येतील, यासाठी निवडणुकीत प्रचाराला वेग आल्याचे चित्र आहे.
बाजार समितीची निवडणूक ही सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हल्लीच्या राजकारणात सहकार क्षेत्रातून आलेल्यांनी मोठी झेप घेतली आहे. १८ संचालक निवडीसाठी नेत्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत असलेल्या तीन पॅनेलपैकी सहकार पॅनेलचे नेतृत्व आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके तर विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड हे करीत आहे. परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी आ. संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, मनोज देशमुख, सुनील वऱ्हाडे हे करीत आहेत. तसेच शेतकरी एकता पॅनेलने तिसरी आघाडी तयार करून या निवडणुकीत रंगत आणली आहे. या पॅनलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे हे करीत आहे. या नेत्यांनी पॅनेलचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी सोसायट्या, खरेदी विक्री केंद्रे, ग्रामपंचायती, पंचायत समित्या व बाजार समित्या काबीज करण्यासाठी फार पूर्वीपासून जोरदार तयारी चालविल्याचे दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीला उणेपुरे आठ दिवस शिल्लक असताना नेत्यांनी आपल्या गटातील संचालक कसे निवडून येतील, यासाठी राजकीय अनुभव वापरत आहे. पॅनेलनुसार नेते प्रचाराला एकत्र फिरताना आपल्या गटातील व्यक्ती कसा निवडून येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. ऐरवी एकमेकांविरुद्ध आरोपाच्या फैरी झाडणारे नेते आता बाजार समिती निवडणुकीत हेवेदावे बाजुला ठेवून एकत्र फिरु लागले आहेत. बाजार समितीत पक्षीय राजकारण नसल्याचे प्रचारादरम्यान ठामपणे सांगण्याचा प्रयत्न हे नेते करीत असले तरी सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी ते कोणतीही संधी सोडताना दिसून येत नाही, हे विशेष.