बडनेऱ्यात मार्चपूर्वीच जलकुंभाच्या कामाला प्रारंभ
By admin | Published: February 27, 2016 12:06 AM2016-02-27T00:06:55+5:302016-02-27T00:06:55+5:30
बडनेरा आणि निम्म्या अमरावती शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मार्चपूर्वीच बडनेरा जुनीवस्तीत नव्या जलकुंभ निर्मितीचे काम सुरू केले जाईल,
रवी राणांचा निर्णय : शहरातील पाणीटंचाईवर मजीप्रात बैठक
अमरावती : बडनेरा आणि निम्म्या अमरावती शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मार्चपूर्वीच बडनेरा जुनीवस्तीत नव्या जलकुंभ निर्मितीचे काम सुरू केले जाईल, असा निर्णय आ.रवी राणा यांनी शुक्रवारी घेतला. त्याअनुषंगाने जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात पाणीटंचाईच्या कामांविषयी आ. रवी राणा यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. राणा यांनी बडनेरा मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत आढावा घेतला.
यावेळी मजीप्राच्या अधीक्षक अभियंता स्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता पी. डी. भामरे यांनी निम्मे अमरावती व बडनेरा शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविषयी वस्तुस्थिती विशद केली. बडनेरा शहरातील जुनीवस्ती येथे जीर्ण झालेले जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले आहे. हे जलकुंभ अमृत योजनेतून साकारण्यासाठी निधी मिळणार आहे. मात्र या प्रक्रियेला कालावधी असून निधी मिळताच बडनेऱ्यात जलकुंभ निर्माण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बडनेरा शहरात नवीवस्ती येथे असलेल्या एकाच जलकुंभातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे मजीप्राचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी माहिती दिली. त्यामुळे एकदा जलकुंभात पाणी साठा केल्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग ओढावत आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार एकाच भागात पाणीपुरवठा करण्याचे दोन नियमावली असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आ. राणा यांनी अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यानंतर आ. राणा यांनी बडनेरा शहरात नवीन जलकुंभ साकारण्यासाठी मार्चपर्यत जलकुंभाचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. या आढावा बैठकीला रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, नगरसेवक अजय गोंडाने, राजेंद्र महल्ले, विजय नागपुरे, अंबादास जावरे, अधीक्षक अभियंता स्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता पी. डी. भामरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, के. टी. उमाळकर, सुदर्शन जैन, मुन्ना रुणवाल, नीळकंठ कात्रे, सुदाम बोरकर, विलास वाडेकर, शैलेंद्र कस्तुरे, टेकचंद केसवानी, भाईजी जायवाल, जितू दुधाने, सुनील राणा, नितीन बोरेकर, अजय मोरय्या, उमेश ढोणे, किशोर गनवाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)