सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:39+5:302021-05-26T04:12:39+5:30

भिल्ली येथे भावंडांना मारहाण धामणगाव रेल्वे : तालुक्यातील भिल्ली येथे प्रमोद खंडाते व प्रकाश खंडाते यांना मारहाण करण्यात आली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

भिल्ली येथे भावंडांना मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील भिल्ली येथे प्रमोद खंडाते व प्रकाश खंडाते यांना मारहाण करण्यात आली. वाहनाला कट का मारला, अशी विचारणा केल्याने २३ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी जगदीश काळमेघ, अमर काळमेघ, आकाश काळमेघ, अजय काळमेघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात अजय काळमेघ यांच्या तक्रारीवरून खंडाते बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

हिंगणगाव येथे सुरक्षा रक्षकाला मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील हिंगणगाव कोविड सेंटरमध्ये खासगी सुरक्षा रक्षक असलेल्या ४२ वर्षीय इसमाच्या मांडीवर चाकूने वार करण्यात आला. २३ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी विनोद घोडम (३२, कृष्णानगर, जुना धामणगाव रेल्वे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

वरूडच्या माहेरवासिनीचा दिल्लीत छळ

वरूड : येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा सासरी दिल्ली येथे शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ८ नोव्हेंबर २०१९ ते ८ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी तन्वीर अन्सारी शेख मोबीन, उबेद अन्सारी व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

वरूड : तालुक्याला लागून मोठे जंगलक्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकांचे राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. शेतकरी रात्री शेतात राहून ओलित करतात. मात्र, वन्यप्राण्यांचा वाढता हैदोस शेतकऱ्यांकरिता मारक ठरला आहे.

-------------------

‘विवाह समारंभात कमी उपस्थितीची अट शिथिल करा’

अमरावती : जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभाकरिता केवळ १५ जणांना परवानगी दिली. १५ लोकांमध्ये विवाह कसा करावा, असा यक्षप्रश्न वधुपित्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे अनलॉक करताना १५ लोकांची अट शिथिल करावी, अशी आग्रही मागणी समोर आली आहे.

-----------

मास्क नसतानाही अनेक दुकानांत प्रवेश

अमरावती : येथील अनेक आस्थापना, कार्यालये, बँकांमध्ये कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष ना लोक मास्क घालून प्रवेश करतात, ना विनामास्क प्रवेश करणाऱ्याला कुणी अटकाव घालतो. हॅन्ड सॅनिटायझर,फिजिकल डिस्टन्सिंग तर केव्हाचेच बाद झाले आहे. कुठेही हॅन्ड सॅनिटायझर ठेवलेले नाही.

--------------

ग्राहकांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर टाका रेशनची माहिती

अमरावती : जिल्हाधिकारी शेैलेश नवाल यांनी १४ मे रोजी लॉकडाऊनसंदर्भात नवीन आदेश काढले आहेत. त्यात रेशन दुकानेही सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थींचेा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून, टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत. गर्दी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

-----------

जिल्ह्यात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर बंधनकारक

अमरावती : लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून कोणतेही वाहन आल्यास त्यातील व्यक्तींकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. राज्याच्या सीमावर्ती परिसरात मोर्शी, अचलपूर, धारणी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना तपासणीचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

------------

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यायन केंद्र हवे

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारा (अध्यायन) केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा व विद्यापीठात तुकडोजी महाराज विचारावर आधारित शॉर्ट टर्म कोर्सेस तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी राज्यपालनामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली.

--------------

पेरणी हंगाम जवळ असल्याने कामांना गती

अमरावती : कोरोना साथीमुळे शासकीय कार्यालयांत उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा असल्या तरी अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये सुरू आहेत. कृषी कार्यालयांकडून आवश्यक तिथे प्रत्यक्ष हजर राहून व शक्य तिथे ऑनलाईन कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. पेरणीचा हंगाम जवळ असल्यामुळे कामांना गती देण्यात आली आहे. ही कामे करताना कोविड प्रतिबंधात्मक दक्षतेचे पालन करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी कार्यालयातर्फे देण्यात आली.

-------------

फोटो पी २५ शिरखेड

डीबी बंद, शेतकऱ्यांचे नुकसान

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील इंगळे यांच्या शेतातील डीबी १५ दिवसांपासून सतत बंद असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याकडे संबंधित अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी फारच त्रस्त झाला आहे.

------------

फोटो पी २५ कोरोना शिरखेड

नया वाठोडा येथे कोविड लसीकरण

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा ग्रामपंचायतीत २४ मे रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे आयोजन केले होते. येथे नेरपिंगळाई आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण ६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत जनजागृतीदेखील करण्यात आली.

--------

१९ निकृष्ट सोयाबीन बियाणे बॅगची मिळाली रक्कम परत

अमरावती : जावरा येथील शेतकरी रमेश भोरे यांना निकृष्ट दर्जाच्या १९ सोयाबीन बॅगची रोख रक्कम जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, कृषी समितीचे सदस्य प्रकाश साबळे, कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. तब्बल सात महिन्यांनंतर प्रकाश साबळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते शक्य झाले.

------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.