निवडणुकीची लढाई जाती-धर्मासाठी नसून शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:07 IST2024-11-16T11:04:21+5:302024-11-16T11:07:32+5:30
Amravati : बच्चू कडू यांची भावनिक साद; करजगावच्या सभेने मोडला गर्दीचा विक्रम

The election fight is not for caste-religion but for the right of the last man
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामान्य नागरिकांच्या मतामध्ये मोठी ताकद आहे. एका मताने सत्ता परिवर्तन होऊ शकते तर तुमच्या एका मताने दिव्यांग मंत्रालय स्थापन करता येऊ शकते, असे मत परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी गुरुवारी करजगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केले. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांचा मतदारसंघात मोठ्या उत्साहात प्रचार सुरू आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करजगाव येथील सभेला रमेशराव भेंडे, संजाबराव कविटकर, ऊकंडराव नागोसे, प्रसन्ना वाकोडे, गजेंद्र दहिकर, दामूभाऊ उमक, रामभाऊ ठाकरे, तैयब भाई, जावेद खान, पठाण झाकीर हाजी साहब मोहसीन जमील, तस्लिम खान, जावेद भाई, महेमूद भाई, जमील भाई, मुबारिक भाई, रमेश सोनार, बाळा धाडसे, अमित शिरभाते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, प्रहारचा झेंडा हा समाजसेवेचा झेंडा आहे. मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे, दिव्यांग मंत्रालय निर्माण करणे हे केवळ तुमच्यासारख्या सुज्ञ जनतेच्या सहकार्याने शक्य झाले आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी सदैव उभा राहून त्यांच्यासाठी आपला अविरत लढा सुरूच आहे. शिवाय विविध धार्मिक कार्यातसुद्धा आपण महाराष्ट्रातील इतर आमदारांच्या पुढे असून, आपल्या मतदारसंघात शेकडो कोटी रुपये धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी उपलब्ध केले. एवढेच नाही तर करजगाव येथील कार्तिक स्वामी मंदिराला 'ब' वर्ग दर्जा प्राप्त करून देत तीन कोटी रुपये मंदिराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिले. यामुळे मंदिराचा कायापालट सुरु असल्याचे ते म्हणाले.
बच्चू कडू यांचा करजगाव भागात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. गुरुवारी त्यांनी दोन्ही गावांतील मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचार यात्रेला सुरुवात केली. त्यांनतर त्यांची जंगी सभा पार पडली. या सभेमध्ये जमलेल्या गर्दीने बच्चू कडू यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट असल्याचे जाणवत होते. यावेळी महिलांनी बच्चू कडू यांचे औक्षण करत त्यांना शुभकामना दिल्या. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत करून कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी विजयाच्या घोषणा दिल्या.