निवडणुकीवर ६ हजार ५०० पोलिसांचा 'वॉच'

By admin | Published: February 21, 2017 12:08 AM2017-02-21T00:08:24+5:302017-02-21T00:08:24+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २१ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी ६ हजार ५०० पोलीस 'वॉच' ठेवून आहेत.

'Watch' of 6,500 police on election | निवडणुकीवर ६ हजार ५०० पोलिसांचा 'वॉच'

निवडणुकीवर ६ हजार ५०० पोलिसांचा 'वॉच'

Next

५० सीसीटीव्हींद्वारे निगराणी : शहरात अडीच हजार, ग्रामीणमध्ये चार हजार पोलीस तैनात
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २१ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी ६ हजार ५०० पोलीस 'वॉच' ठेवून आहेत. यामध्ये ग्रामीण पोलीस हद्दीत चार हजार, तर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बंदोबस्तासाठी अन्य ठिकाणाहूनसुद्धा अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे.
शहरात एकूण ९२१ मतदान केंद्र आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात ७४१ व जिल्हा परिषदेचे १८० मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याकरिता आयुक्तांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक बंदोबस्ताचे नियोजनबद्ध कामकाज करण्यात आले असून पोलीस सर्व बाजूने चौकस नजर ठेवून राहणार आहेत. निवडणुकीपूर्वीपासून शहरात नाकाबंदी लावून वाहनाची तपासणी करण्यात आली, तर अवैध व्यवसायांवर कारवाईचा सपाटा सुरु केला. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी विशेष मोहिम राबवून गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई सुध्दा करण्यात आलेली आहे. २१ फेब्रुवारी रोजीच्या दिवशी पोलीस आयुक्त मंडलीक स्वत:हा शहरात गस्त घालणार आहे. शहरात १० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार स्ट्रार्इंकिंग फोर्स, रिस्पॉन्स टिम व एसआरपीएफ कंपनी आपातकालीन स्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
कलम १४४ लागू
२१ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्र व आसपासच्या परिसरात मतदाराची व नागरिकांची गर्दी होऊन मतदान केंद्राच्या कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्तांच्या अधिकार क्षेत्रातील फौजदारी प्रकिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये आयुक्तालय हद्दीतील सर्व मतदान केंद्राच्या २०० मिटर परिसरात सकाळी ६ वाजतापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यामध्ये पार्टी मंडप लावणे, मतदार वाहतूक करणे, जाहिररीत्या ओरडणे अथवा मोठ्याने आवाज काढणे, मतदारांच्या व्यतिरिक्त जमाव करणे, गर्दी करणे, झेरॉक्स, फॅक्स मशिन, एसटीडी फोन बुथ चालू करणे, हॉटेल, पानठेले व खाद्य पदार्थ प्रतिष्ठाने सुरू ठेवणे, अशा बाबीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

तत्काळ पोहोचणार पोलीस
निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवेळी शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही काही अप्रिय घटना किंवा काही समस्या उद्भवल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला कळवा. शहरातील तक्रारीच्या घटनास्थळी पाच मिनिटात, तर आयुक्तालयात हद्दीतील ग्रामीण भागात १० मिनिटात पोलीस पोहोचणार आहे. तसे नियोजन पोलीस आयुक्तांनी केले असून यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या आहेत.

शहरात तीन उपायुक्त, आठ सहायक आयुक्त तैनात
शहरातील निवडणूक प्रक्रियेच्या बंदोबस्त पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नेतृत्वात ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ११२ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ५०० पोलीस शिपाी, ७०० होमगार्ड तसेच १ एसआरपीएफ कंपनी तैनात राहणार आहे. याशिवाय बाहेरगावावरून बोलाविण्यात आलेल्या बंदोबस्तात १ सहायक पोलीस आयुक्त, ५ पोलीस निरीक्षक, ३० एपीआय व पीएसआय, ३२० पोलीस शिपाई व ७०० होमगार्डचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस अधिकारीव कर्मचारी तसेच दोन होमगार्ड तैनात केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर विशेष लक्ष
जिल्ह्याची सीमा व शहरातील आठ सिमेवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार असून अवैध दारु व्यवसाय, तस्करी, पैशांची देवाण-घेवाण व प्रचार साहित्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी महसुल व पोलीस विभागाने समन्वय साधला आहे.

ग्रामीणमध्ये १० डीवायएसपी, २० पीआय
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या नेत्तृत्वात ग्रामीण भागात तब्बल चार हजार पोलीस तैनात राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे १ हजार ८४२ मतदान केंद्र असून यामध्ये १७७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या नेतृत्वात १० डीवायएसपी, २० पोलीस निरीक्षक, १७० पीएसआय, २ हजार ६२० पोलीस कर्मचारी व एक एसआरपीएफ कंपनी तैनात राहणार आहे. याशिवाय बाहेरगावावरून बोलाविण्यात आलेल्या बंदोबस्तात २ डिवायएसपी, एक पोलीस निरीक्षक, ५ पीएसआय, ८५० पोलीस शिपाई, ६०० होमगार्ड व १ अतिरिक्त एसआरपीएफ कंपनी तैनात राहणार आहे.

२८ उपद्रवशील केंद्रांवर लक्ष
शहर आयुक्तालय हद्दीत २८ उपद्रवशिल मतदान केंद्र असून या केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. राजापेठ १, कोतवाली १, खोलापुरी गेट ६, गाडगेनगर ६, नागपुरी गेट ६, फे्रजरपुरा ६, बडनेरा ४, नांदगाव पेठ १ व वलगाव येथील १ मतदान केंद्रचा सहभाग आहे.

शंभरावर गुन्हेगार 'डिटेन' करणार
गुन्हेगारी पार्श्वभूमिच्या आरोपींना २१ फेब्रुवारी रोजी 'डिटेन' केले जाणार असून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शंभरावर गुन्हेगारांना पोलीस ठाण्यातच बसून ठेवण्यात येणार आहे. तसेच रेकॉर्डवर असणाऱ्या दीडशे गुन्हेगार हे पोलिसांच्या निगराणीत राहणार आहे. त्याचप्रमाणे टॉप टेनमधील गुन्हेगारांना सोमवारी रात्रीपासूनच हद्दपार केले जाणार आहे.

Web Title: 'Watch' of 6,500 police on election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.