चोरीचा कलंक केव्हा पुसणार?
By admin | Published: September 8, 2015 12:17 AM2015-09-08T00:17:40+5:302015-09-08T00:17:40+5:30
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही राज्यातील फासे पारधी समाज आजही दऱ्या, खोऱ्यात राहून असह्य जगणे जगत आहे.
राज्यपालांची भेट : फासे पारधी समाजाचा सवाल
अमरावती : स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही राज्यातील फासे पारधी समाज आजही दऱ्या, खोऱ्यात राहून असह्य जगणे जगत आहे. कोठे चोरी, दरोडे पडल्यास फासे पारधी समाजाला लक्ष्य केले जाते. हा शिरस्ता किती दिवस चालणार, असा सवाल फासे पारधी समाजाचे युवा नेते मतीन भोसले यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या पुढ्यात ठेवला.
मुंबई येथे राजभवनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने राज्यपाल राव यांची नुकतीच भेट घेऊन आदिवासी समाजाने व्यथा मांडल्या. यावेळी मतीन भोसले यांनी फासे पारधी समाजाचे प्रश्न, समस्या मांडताना या समाजाला चोरीचा लागलेला कलंक कधी पुसला जाणार, असे म्हणत शासन, प्रशासनस्तरावर होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली. फासे पारधी समाज हा आदिवासी समाजात गणला जात असला तरी आजही हा समाज अशिक्षित आहे. विकास, शिक्षण, उत्थान या सर्व बाबी फासे पारधी समाजासाठी केवळ कागदोपत्री असल्याचे भोसले यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यपालांसोबतच्या १५ मिनिटाच्या संवादात मतीन भोसले यांनी राज्यातील फासे पारधी समाजाचे जगणे हे विशद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत आदिवासी समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याची तरतूद केली आहे. मात्र, आदिवासी समाजाच्या नावे बोगस आदिवासी शिरकाव करीत असल्याचा आरोप मतीन भोसले यांनी केला. फासे पारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण, स्वयंरोजगार, नोकरीत वाटा मिळाला पाहिजे, हे मुद्दे त्यांनी प्रखर्षाने मांडले. दरम्यान भोसले यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या आश्रम शाळेला शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्याची मागणी रेटून धरली. भूमिहीन फासे पारध्यांना ई-क्लास शेत जमिनीचे पट्टे वाटप, उदरनिर्वाहाचे साधन द्यावे, फासे पारधी समाजाला लागलेला चोरट्यांचा लागलेला कलंक पुसून काढावा, प्रत्येक फासे पारधी समाजाच्या मुलाला शिक्षण अनिवार्य करावे अशा विविध मागण्या रेटून या समाजाची दैनावस्था भोसले यांनी मांडली. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी पुढाकार घेत फासे पारधी समाजाच्या समस्या, प्रश्न, व्यथा समजून घेतल्याबद्दल मतीन भोसले यांनी राज्यपालांचे अभार मानले. यावेळी आदिवासी समाजाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, आ. राजू तोडसाम, दशरथ मडावी, किरण कुमरे, विनोद पवार, अजाबराव उके आदी उपस्थित होते.