पांढऱ्या सोन्यातून ‘व्हाईट मनी’ !

By admin | Published: November 15, 2016 12:07 AM2016-11-15T00:07:17+5:302016-11-15T00:07:17+5:30

शासनाने कपाशीसाठी प्रतिक्विंटल ४१६० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. परंतु जादा रकमेच्या आशेने शेतकरी व्यापाऱ्यांना कपाशीची विक्री करतात.

White money 'from white gold! | पांढऱ्या सोन्यातून ‘व्हाईट मनी’ !

पांढऱ्या सोन्यातून ‘व्हाईट मनी’ !

Next

व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांना आमिष : साडेपाच हजार भावाने खरेदी
संदीप मानकर अमरावती
शासनाने कपाशीसाठी प्रतिक्विंटल ४१६० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. परंतु जादा रकमेच्या आशेने शेतकरी व्यापाऱ्यांना कपाशीची विक्री करतात. व्यापारी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रतीक्विंटल साडेपाच हजार ते सहा हजार रूपये दराचे आमिष देऊन जुन्या चलनाद्वारे व्यवहार करीत आहेत. व्यापाऱ्यांनी ‘ब्लॅक मनी’ ‘व्हाईट’ करण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. जादा दराच्या लालसेने काही शेतकरी देखील जुन्या नोटा स्वीकारून या व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार व पाचशे रूपयांच्या नोटा हद्दपार केल्यात. त्यामुळे सगळीकडे नोटांची अदलाबदल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, धनदांडग्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ३० डिसेंबरपर्यंत हा ब्लॅकमनी व्हाईट करण्याकरिता नवनवीन क्लृप्ती लढविल्या जात आहेत.
ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कपाशीची विक्री करण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना भरीस घालत आहेत. त्यासाठी त्यांना जादा दराचे आमिषही दिले जात आहे. परंतु हा व्यवहार जुन्या चलनात करण्याची अट घातली जात आहे. शेतकरी देखील जादा दराच्या लालसेने ही अट मान्य करताना दिसत आहेत. हे जुने चलन स्वत:च्या खात्यात टाकून शेतकरी ते बदलवून घेऊ शकतात. यातून व्यापाऱ्यांचा काळा पैसाही मार्गी लागणार आहे, हे विशेष.
सद्यस्थितीत बँकांचे सर्व मोठे व्यवहार ठप्प असताना मोठ्या प्रमाणात कपाशीची खरेदी कशी काय होते, हा प्रश्नही निर्माण झाला असताना नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका शेतकऱ्याने हा प्रकार लोकमतला सांगितला. एकीकडे शेतकऱ्यांकडे शंभरच्या नोटा नाहीत तर दुसरीकडे शासनाने बाद ठरविलेल्या पाचशे व हजारांच्या नोटांचा ग्रामीण भागात मात्र महापूर आला आहे. अनेक जिनिंग-प्रेसिंगमध्ये हजारो क्विंटल कापूस दाखल होत आहे! बँकेतून दरदिवसाला अल्प रक्कम काढता येते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडेही अद्याप नवीन चलन पोहोचलेले नाहीत. मग, जिल्ह्यात हजारो क्विंटल कपाशीची खरेदी होते कशी, हा प्रश्न उदभवत आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी आणि काळ्या पैशाची गुंतवणूक करणाऱ्यांवर अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे

-तर मग पोलिसांनी ‘चेकपोस्ट’ लावावे
शेतकऱ्यांची अडवणूक करुन, त्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवून हमीभावापेक्षा दामदुप्पट दर देऊन जुन्या चलनातून कपाशीची खरेदी करण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. ‘ब्लॅक मनी व्हाईट’ करण्याचा हा नवीन फंडा असून याकरीता शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा हजार रूपये प्रतीक्विंटल दर दिला जात आहे. हमीभावापेक्षा तब्बल दीड हजार रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्याला कापूस विकत आहेत. यामाध्यमातून कोट्यावधींचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. मात्र, पोलिसांनी ग्रामीण भागात हा पैसा पोहोचण्यापूर्वीच ‘चेकपोस्ट’लाऊन कारवाई करावी, अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे.

व्यापाऱ्याला बिल मागावे
शेतकऱ्यांची दिशाभूल करुन त्यांना व्यापारी जुने चलन घेण्याची गळ घालीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकताना एक तर नवीन चलनाच स्वीकारावे किंवा व्यवहार झाल्यानंतर व्यापाऱ्यांना पावती मागावी, असे मत काही प्रगतीशिल शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यादिशेने विचार व्हावा.

राज्यातील बोटांवर मोजण्याइतक्या बाजार समिती वगळता इतर बाजार समितींच्या माध्यमातून शेतकरी कापूस विकत नाहीत. पण, यावर्षी बाजार समितीत कापसाची हमीभावाने खरेदी सुरु करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- सुनील वऱ्हाडे, सभापती, बाजार समिती अमरावती.

Web Title: White money 'from white gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.