शिरूरकासार तालुक्यातील ६२ गावे झाली कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:14+5:302021-07-13T04:08:14+5:30

विजयकुमार गाडेकर शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मोठा दिलासा मिळत आहे. ६२ गावे कोरोनामुक्त झाली असून, शहरासह ...

62 villages in Shirurkasar taluka became corona free | शिरूरकासार तालुक्यातील ६२ गावे झाली कोरोनामुक्त

शिरूरकासार तालुक्यातील ६२ गावे झाली कोरोनामुक्त

Next

विजयकुमार गाडेकर

शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मोठा दिलासा मिळत आहे. ६२ गावे कोरोनामुक्त झाली असून, शहरासह तेरा गावांत दहा दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण निघाला, तर उर्वरित वीस गावांत रुग्णसंख्येचे प्रमाण दोन ते सातपर्यंत निघाले आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त एक जुलै ते दहा जुलैपर्यंतच्या अहवालानुसार हे चित्र स्पष्टपणे दिसून येते. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झालेली दिसत असली तरी तो अजून संपला नसल्याचेही दिसून येत असल्याने गाफील राहून चालणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यात ६८ जणांना प्राण गमवावा लागला असल्याने कोरोनाची जखम खोलवर रुतली गेली. ती विसरता येत नाही.

तालुक्यात ९५ गावे असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १ लाख २८ हजार होती. ती आता जवळपास १ लाख ४० हजारांपर्यंत गेली असेल, सर्वच गावांत कमी-अधिक प्रमाणात कोरोनाने वेढा टाकला होता. हा वेढा तोडण्यासाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी कसरत केली. जमेल तसे या कोरोना कुरुक्षेत्रावर बाजी लावली. त्यात आतासी कुठे दिलासा मिळत असल्याचे दिसून येते. तरीदेखील भीती मात्र कायम असल्याने अजूनही सावध राहण्याची गरज आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वांनी नियमावलीच्या चौकटीतच राहणे गरजेचे आहे; परंतु सध्या सुरू असलेले व्यवहार व गर्दी पाहता शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही.

एक ते दहा जुलैपर्यंत कोरोना अहवाल पाहता ३३ गावांतून कोरोना अजूनही गेलेला नाही, हे स्पष्ट होते. ६२ गावे मात्र सध्या तरी कोरोनामुक्त असल्याचे अहवाल सांगतो.

शिरूरसह आव्हळवाडी, वंजारवाडी, विघनवाडी, घा. पारगाव, मातोरी, आर्वी, पाडळी, आनंदगाव, पिंपळनेर, फुलसांगवी, भानकवाडी व नागरेवाडी या गावांत प्रत्येकी एकच बाधित रुग्ण निघाला असल्याने ही गावेदेखील कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तर पौंडूळ, मानूर, बरगवाडी, खरगवाडी, खांबा, गोमळवाडा, टेंभुर्णी व बोरगाव चकला या गावांत दोन बाधित निघाले. रायमोह, धनगरवाडी, तर डगव्हण, झापेवाडीत तीनशिवाय हिवरसिंगा चार, तागडगाव, तिंतरवणी पाच, लोणी राळेसांगवी व खालापुरीमध्ये सहा बाधित रुग्ण निघाले. या दहा दिवसांच्या कालावधित वारणी व खोकरमोहा येथे सर्वाधिक म्हणजे सात कोरोना रुग्ण निघाले असल्याचे दिसून येते. दहा दिवसांच्या कालावधीत तालुक्यात ८८ रुग्ण निघाले, तर कोरोनामुळे आतापर्यंत ६८ लोकांना प्राण गमवावा लागला.

सर्वांच्या सहकार्यामुळे आताशी कुठे रुग्णसंख्येत घट झाली असून, कोरोनाकाळात अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासन, प्रशासनाला सहकार्य केले. नागरिकांनीदेखील समजून घेतले. त्यामुळेच तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. तो मुक्त होण्यासाठी नागरिकांनी सावधगिरीचा पवित्रा कायम ठेवणे गरजेचे असल्याचे संयुक्तिक आवाहन प्रशासनाकडून तहसीलदार श्रीराम बेंडे, पो.नि. सिद्धार्थ माने, स.पो.नि. डॉ. रामचंद्र पवार, तसेच ता.आ.अ. डाॅ. अशोक गवळी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Web Title: 62 villages in Shirurkasar taluka became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.