सावधान! १५३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:30+5:302021-07-14T04:38:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणी साठ्यातील पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणी साठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. ११ पैकी ७ तालुक्यांनी नमुनेच पाठविलेले नाहीत; परंतु ज्या चार तालुक्यांतील ८३५ पाणी नमुने आले, त्यापैकी तब्बल १५३ नमुने दूषित आढळले आहेत. मे व जून महिन्यातील हा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. यावरून पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोना उपाययोजनांमध्ये आरोग्य विभाग व्यस्त झाला. त्यामुळे पिण्याचे पाणी नमुने घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. नमुन्यांची संख्या तर घटलीच, शिवाय ज्यांनी पाठविले त्यांचा दूषित येण्याचा आकडाही मोठा आहे. ग्रामीण भागातून ४७७ नमुने घेतले असून, त्यात १३१ दूषित आढळले आहेत, तसेच शहरी भागातून ३५८ नमुने घेतले असून, २२ दूषित आढळले आहेत. त्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रयोगशाळेत रासायनिक सहायक करुणा गायकवाड, एस.एम. पोपळघट, आर.व्ही. वाघमारे, के.टी. जाधव, एम.आर. गायकवाड, बी.एल. दखणे ही टीम काम करते.
११ पैकी ७ तालुक्यांची कामात कुचराई
कसलेही कारण न सांगता प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकांनी गावात जाऊन पिण्याचे पाणी असलेल्या सार्वजनिक पाणी साठ्यांचे नमुने प्रयोशाळेत पाठविणे बंधनकारक आहे.
असे असले तरी आरोग्य सहायक व इतर कर्मचारी कुचराई करतात. ११ पैकी सात तालुक्यांतून मागील दोन महिन्यांत पाणी नमुने पाठविण्यास कुचराई झाल्याचे उघड झाले आहे.
यात माजलगाव, आष्टी, धारूर, परळी, शिरूर, पाटोदा आणि वडवणी तालुक्यांचा समावेश आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
या आरोग्य केंद्रांना पत्र
ज्या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविले नाहीत, अशांना प्रयोगशाळेकडून पत्र काढण्यात आले आहे. यात राजुरी, साक्षाळपिंपरी, चकलांबा, उमापूर, सादोळा, पात्रूड, किटीआडगाव, टाकरवण, गंगामसला, धामणगाव, कडा, सु. देवळा, खुंटेफळ, टाकळसिंग, भोगलवाडी, मोहखेड, पोहनेर, धर्मापुरी, नागापूर, सिरसाळा, मोहा, खालापुरी, शिरूर का., नायगाव, वाहली, डोंगरकिन्ही, अंमळनेर, आपेगाव, भावठाणा, कुप्पा या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविलेले नाहीत. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच सामान्य जनता दूषित पाणी पित असल्याचे दिसते.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !
साथरोग व जलजन्य आजारापासून बचावासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे.
पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची काळजी घेऊन ते वाहते करावे.
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावेत.
ज्या आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाणी नमुने गेले नाहीत, त्यांना तत्काळ सूचना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार म्हणाले.
कोरोनामुळे पाणी नमुने येण्याची संख्या घटली आहे. पाणी नमुने पाठविण्यास उशीर झाल्यास तत्काळ पत्र काढले जाते, तसेच दूषित पाणी नमुन्यांची माहिती मेलद्वारे कळवून उपाययोजना करण्यास सांगितले जात असल्याचे वरिष्ठ रासायनिक सहायक करुणा गायकवाड म्हणाल्या.
120721\12_2_bed_14_12072021_14.jpeg
जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुणे तपासणी करताना पथक दिसत आहे.