कारखाना चालवता येईना आणि जिल्ह्याच्या कारभारात सल्ले कसले देता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:59 AM2021-03-13T04:59:00+5:302021-03-13T04:59:00+5:30
लक्ष्मण पौळ यांचा पंकजा मुंडेंना सवाल परळी : स्व. गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभारलेल्या व आशिया खंडात नावलौकिक ...
लक्ष्मण पौळ यांचा पंकजा मुंडेंना सवाल
परळी : स्व. गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभारलेल्या व आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या वैद्यनाथ कारखान्याने दीड वर्षांपासूनचे कर्मचाऱ्यांचे वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी वैतागून १० मार्च रोजी अक्षरशः बंद पाडला आहे आणि कारखान्याच्या अध्यक्षा, माजी पालकमंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कसा कारभार करावा, यावर सल्ले देत आहेत. ही बाब अजब आणि अनाकलनीय आहे, असा टोला परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी लगावला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून ३४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच वैद्यनाथ देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही घोषणा नुकतीच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र विविध आध्यात्मिक गडांचे राजकारण केले. परंतु, धनंजय मुंडे यांनी मात्र जिल्ह्यातील गडांना निधी उपलब्ध करून देत विकासाची कास धरली आहे, असे पौळ म्हणाले.
दुसरीकडे जिल्ह्याचा कारभार कसा चालवला पाहिजे हा सल्ला देणाऱ्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी याच वैद्यनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे दीड वर्षांपासूनचे वेतन थकवले! जिल्ह्याच्या कारभारात सल्ले देण्याऐवजी ताईंनी कारखान्यातील अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, या कर्मचाऱ्यांच्या मुला-बाळांचा विचार करावा व कारखाना सुरळीत चालवावा, असेही लक्ष्मण पौळ यांनी म्हटले आहे.