खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:58+5:302021-07-16T04:23:58+5:30
अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच किराणा सामानात इतरही विविध साहित्याचे भाव वाढल्यमुळे ...
अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच किराणा सामानात इतरही विविध साहित्याचे भाव वाढल्यमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. कमी झालेले सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे अचानक सात ते आठ रुपयांनी वाढले. या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
--------------
एटीएममध्ये रांगा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अर्थकारणाला हळूहळू चालना मिळू लागली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले वेतन, तर काही जणांना मिळालेला बोनस बँकांमध्ये जमा झाला आहे. बँकांमध्ये वाढती गर्दी पाहून पैसे उचलण्यासाठी नागरिकांनी एटीएमचा पर्याय निवडला आहे. शहरातील सर्वच एटीएमवर नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने रांगा लागत आहेत.
--------
मास्क हेच प्रभावी औषध
अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. कोरोनाची संभाव्य लाट ओळखून शहरवासीयांनी दक्षता बाळगावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.
---------
स्टेशनरी दुकानदार आले अडचणीत
अंबाजोगाई : यावर्षी अजूनही शैक्षणिक वर्ष सुरू न झाल्याने स्टेशनरी दुकानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन झाले. ऐन जून, जुलै या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये बंद राहिली. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. तोपर्यंत स्टेशनरी दुकानदारांच्या व्यवसायाला गती येणार नसल्याने सध्या तरी स्टेशनरी दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
----------
जैविक कचरा रस्त्यावर
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात बहुतांश खाजगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर आहेत. अनेक रुग्णालयांतील जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्यात येत नसल्याने हा जैविक कचरा रस्त्यावर टाकला जातो. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. शहरातील अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या बाजूला असा कचरा दिसून येतो. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे अक्षय भूमकर यांनी केली आहे.
----------
शैक्षणिक कर्जातून सूट देण्याची मागणी
अंबाजोगाई : कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे, तर अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत. अशा स्थितीत ज्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज घेतले त्यांना आता कर्जाचे हप्ते भरणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. अशा स्थितीत शासनाने शैक्षणिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांना व्याज माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश अकोलकर यांनी केली आहे.
----