रेल्वे क्रॉसिंगचे काम अयोग्य पद्धतीने सुरू - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:23 AM2021-07-18T04:23:54+5:302021-07-18T04:23:54+5:30
आष्टी : अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामावर तालुक्यातील कडा येथील केरुळ रोडवर वळण रस्ता व रेल्वे क्रॉसिंगचे काम ...
आष्टी : अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामावर तालुक्यातील कडा येथील केरुळ रोडवर वळण रस्ता व रेल्वे क्रॉसिंगचे काम अयोग्य पद्धतीने सुरू असून, हे काम तत्काळ थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कडा येथील जिल्हा महामार्ग क्रमांक तीन येथील रेल्वे प्रशासनाने सर्व्हे नंबर १९६ व १८९ मधून वळण रस्ता काढून दिलेला आहे. सध्या त्या रस्त्याचे काम चालू असून, सदरील रस्ता कडा कुसळंब, पाटोदा, बीड असा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे, तसेच केरुळ, मोरेवाडी, भवरवाडी, कुसळंब, चिखली, बीड-सांगवी इत्यादी २५ ते ३० गावांना कडा येथील बाजारपेठेत येण्या-जाण्यासाठी उपयुक्त असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी आहे.
सदरील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा जिल्हा महामार्ग तोडताना कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. सर्व्हे नंबर १८९ मधील शेतकऱ्यांना वाढीव क्षेत्राचा मावेजा अल्पदराने मिळाल्यामुळे त्यांनी भूसंपादनाच्या थेट खरेदीस नकार दिलेला आहे. सदरील शेतकरी हे निवाडा पद्धतीने भूसंपादन करण्यास तयार आहेत. सदरील जिल्हा मार्गावरील वळण रस्ता हा फक्त सात मीटर रुंदीमध्ये चालू आहे. सदरील रस्त्याला लागून तीस फूट खोल रेल्वेलाइन आहेे. त्याला कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत नाही, तसेच बाजूला साइट पट्टी सोडलेली नाही. बाजूने पाणी जाण्यासाठी व्यवस्था केलेली नाही, त्यामुळे सदरील रस्ता रहदारीस धोकादायक आहे व अपघात प्रवण क्षेत्र होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो.
सदरील रस्ता हा अरुंद असून, अधिकारी मनमानी करून रस्त्याचे काम करत आहेत. सदरील सर्व्हे नंबर १८९ मधील शेतकरी चर्चा केल्यावर भूसंपादनास कोणताही विरोध करत नाहीत. ते जमीन देण्यास तयार आहेत, फक्त निवडा पद्धतीने व योग्य मावेजाची मागणी करत आहेत, त्यांची ही मागणी गैर नाही. तरी शेतकऱ्यावर अन्याय होऊ न देता, सदरील वळण रस्त्याचे अयोग्य पद्धतीने चाललेले काम बंद करण्यात यावे आणि हे काम योग्य मापानुसार करावे, अशा मागणीचे निवेदन आष्टीचे तहसीलदार, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर महादेव ढोबळे, मनोज ढोबळे, भाऊसाहेब कर्डिले, शेख जाकीर, गणेश नरवडे, भाऊसाहेब गर्जे, तुळशीराम मोरे, प्रभाकर शिंदे, रामहरी शिंदे तसेच आसपासच्या गावातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
160721\0803img-20210716-wa0411_14.jpg