कीटकजन्य आजारांचा वाढला प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:33+5:302021-07-15T04:23:33+5:30
वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना ...
वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाही. घाणीचे साम्राज्य पसरले याचा परिणाम होत आहे.
रस्ता खड्डेमय
वडवणी : येथील आठवडे बाजार रस्ता खड्डेमय झाला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतरावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना त्रास होतो. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.
पिकांवरील रोगांबाबत मार्गदर्शनाची मागणी
वडवणी : गेल्या हंगामात कापसावर आलेली बोंडअळी व बोगस सोयाबीन बियाणे, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही अनेक शेतामधील सोयाबीन पिवळे पडले. तर कपाशीवर ही रोगाचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाने ग्रामीण भागात जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
बांधकाम सुरू झाल्यास मिळेल रोजगार
वडवणी : कोरोनामुळे अनेक शासकीय बांधकामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून, मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासकीय बांधकामे सुरू करण्याची मागणी होत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू तरी पाठ्यपुस्तक नाही
वडवणी : दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियान योजनेतून विद्यार्थ्यांचा हातात पडणारी पाठ्यपुस्तक यावर्षी अर्धा जुलै महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना मिळाली नाही. मागीलवर्षी जून अखेर पुस्तकांचे वाटप झाले होते. परंतु, यावर्षी मात्र पुस्तके कधी मिळणार, यावर कोणीच बोलायला तयार नाही. अशातच १५ जुलैपासून वर्ग आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली होत आहे. अशा स्थितीत पुस्तक शिवाय अध्यापन कसे करावे, अशा प्रश्न शिक्षकांपुढे, तर पुस्तकांविना अध्ययन व गृहपाठ कसा करावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
शेतमजुरीचे दर वाढले
वडवणी : तालुक्यात यंदा मृग व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले वाहते झाले. खरीप पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाची ही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. मात्र मजुरीचे सातत्याने वाढच असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे तर काही ठिकाणी शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पिकांना जीवदान
वडवणी : तालुक्यात सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळत असून काही ठिकाणी झालेल्या पावसाने जीवदान ही मिळत आहे .अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते.