पत्राच्या प्रवासाला लागले तीन महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:21+5:302021-07-15T04:23:21+5:30
उजनी : भारतीय स्टेट बँकेने खातेदाराला मार्च महिन्यात पाठविलेले खात्याबद्दल माहिती देणारे पत्र संबंधित खातेदारास तब्बल चार महिन्यानंतर मिळाले ...
उजनी : भारतीय स्टेट बँकेने खातेदाराला मार्च महिन्यात पाठविलेले खात्याबद्दल माहिती देणारे पत्र संबंधित खातेदारास तब्बल चार महिन्यानंतर मिळाले असून, तीन महिने ते पत्र उजनीच्या टपाल कार्यालयात पडून राहिल्याचे दिसत आहे.
घाटनांदूर टपाल कार्यालयांतर्गत चालत असलेल्या उजनी येथील बी.ओ. कार्यालयाचा दप्तर दिरंगाईपणा यानिमित्ताने उघडकीस आला आहे. घाटनांदूर येथील भारतीय स्टेट बँकेत खाते असणारे ग्राहक विठ्ठलराव कातकडे यांच्या खात्यातील माहिती अपडेट झाल्याविषयी खातरजमा करणारे पत्र बँकेने मार्च महिन्याच्या १६ तारखेला पाठविले होते. ते उजनीच्या टपाल कार्यालयात एप्रिलच्या ८ तारखेला पोहोचले असताना उजनी ते कातकरवाडी हा तीन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी पत्राला टपाल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल तीन महिने लागले असून, ते पत्र १३ जुलै रोजी मिळाल्याचे कातकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अशा दप्तर दिरंगाईमुळे भविष्यात कुणाचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.