चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 00:00 IST2022-02-16T23:59:51+5:302022-02-17T00:00:22+5:30
अंबाजोगाईत कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा

चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास
अंबाजोगाई - शहरातील एका व्यापाऱ्याचे दहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या एका बँकेसमोरून १ लाख ३३ हजारांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी बँक ऑफ इंडिया समोर घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथील विजयकुमार तुळशीराम इस्ताळकर हे धानोरा येथील मतीमंद विद्यालयात निदेशक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार,ते वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच ४४ इ ९४६२) मोंढ्यातील महाराष्ट्र बँकेत गेले. तिथून त्यांनी पगाराच्या खात्यातून १ लाख ३३ हजार रुपये काढले. ती रक्कम एका कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी हँडलला अडकवली आणि जयवंती नगर मधील बँक ऑफ इंडियात जमा करण्यासाठी आले. बँकेसमोर गाडी लॉक करत असताना पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी ती पिशवी लंपास करून पोबारा केला. ही बाब लक्षात आल्याने इस्ताळकर पितापुत्रांनी त्या चोरट्यांचा एसआरटी महाविद्यालयापर्यंत पाठलाग केला परंतु ते हाताला लागले नाहीत. सदर फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो.कॉ. नरहरी नागरगोजे करत आहेत.
चोरटे जोमात, नागरिकात दहशत
अंबाजोगाई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहे. वाहनचोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, बॅग चोरी यापैंकी एखादी घटना नसेल असा एकही दिवस जात नाही. आयुष्यभराच्या कमाईची क्षणात लूट होत असल्याने व्यापारी, नोकरदार, सामान्य नागरिक हवालदिल आहेत. त्यातच यापूर्वीच्या अनेक चोऱ्यांचे तपासही अद्याप पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाहीत. तसेच, शहरातील अवैध धंदे आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्था पाहता पोलिसांचा धाक संपला कि काय अशी शंका येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बिघडलेली परिस्थिती सावरणे गरजेचे झाले आहे.