बाजार बंद असल्याने जनावरांची कवडीमोल भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:04+5:302021-08-22T04:36:04+5:30
नितीन कांबळे/ लोकमत न्यूज नेटवर्क कडा : येथे दर रविवारी जनावरांचा आठवडे बाजार भरायचा. बाजारात शेतकरी गायी, ...
नितीन कांबळे/
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : येथे दर रविवारी जनावरांचा आठवडे बाजार भरायचा. बाजारात शेतकरी गायी, म्हैस, शेळी, बोकड ही जनावरे विक्रीसाठी आणायचे. खरेदीसाठी व्यापारी व ठराविक शेतकरी येत. आर्थिक अडचणी बाजूला व्हायच्या. पण कोरोना सुरू झाल्यापासून जनावरांचा बाजार भरत नसल्याने आता व्यापारी व गरजू शेतकऱ्यांनी मोबाईलवर खरेदी विक्री सुरू केल्याचे चित्र आष्टी तालुक्यात पहावयास मिळत आहे. परंतु मागणी नसल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री करावी लागत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील जनावरांचा आठवडे बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. व्यापारी त्यांच्याकडील विविध जातीच्या गाई, म्हशी, बैल आणतात. तर परिसरातील शेतकरी गायी, बैल, म्हैस, शेळ्या बोकड आणून घर खर्च किंवा शेतीकामे भागावेत म्हणून विक्री करतात. तर काही व्यापारी देखील या मालाला उठाव देतात. त्यामुळे ही उलाढाल चांगली होत असते. एवढेच नव्हे तर यात थंगारी लावून बसलेल्या दलालांना देखील दहा, पाच मिळत असल्याने आर्थिक गाडा सुरू होता. पण मार्चपासून कोरोनामुळे येथील आठवडे बाजार बंदच आहे. आता तर चक्क गाय, म्हैस, बैल, शेळी, बोकड यांचे फोटो काढून समोर व्हाॅटस्ॲपला पाठवून त्याला किंमत सांगितली जाते. त्याला आवडले तर तो येतो पाहतो आणि खरेदी करून होऊन जात आहे. पण बाजारभाव हवा तसा मिळत नाही. ठराविक व्यापारी येेेत असल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री केली जात आहे. एकंदरीत परस्थिती लक्षात घेता आठवडे बाजार खुले करावेत, अशी मागणी शेतकरी अमोल कर्डिले, हनुमंत साबळे, बाळासाहेब जगताप यांनी केली आहे.
....
थेट घरी जाऊन खरेदी
जनावरांची खरेदी विक्री करणे हा आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पण एवढ्या वर्षात पहिल्यांदाच असले दिवस पडल्याने आता मोबाईलवर फोटो मागून किंवा पाठवून शेतकरी यांच्या घरी जाऊन जनावरांची खरेदी करावी लागत असल्याचे केरूळ येथील व्यापारी संजय सपुत्रे, समीर शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...
शेतीला जोडधंदा बरा
सध्या पाऊस पाणी चांगला असल्यामुळे चारा पाणी देखील मुबलक आहे. दुभती जनावरे घेऊन शेतीला जोडधंदा बरा राहतो. घर खर्च चालण्यापुरते पैसे हातात येतात. बाजार बंद असल्याने पैसे वाढवून जनावर खरेदी करावी लागत असल्याचे पाटण येथील शेतकरी उद्धव जगताप यांनी सांगितले.