आता आषाढातही शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:35+5:302021-07-17T04:26:35+5:30
बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ ...
बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत.
आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ होतो. या कालावधीत श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक पौर्णिमेपर्यंत निषिद्ध काल आहे. देवशयनी एकादशी ते प्रबोधनी एकादशीपर्यंतचा कालावधी देवांच्या निद्रेचा मानला जातो. त्यामुळे या कालावधीत लग्नकार्य होत नाही. तुलसी विवाहापासून लग्न कार्याला सुरुवात होते. मात्र अलीकडच्या काळात श्रावण, भाद्रपद आणि इतकेच नव्हे तर पक्ष पंधरवड्यातही लोक विवाह सोहळे करू लागले आहेत. कोरोमुळे विस्कळीत झालेली परिस्थिती त्याचबरोबर काम आणि व्यस्ततेमुळे पुरेसा वेळ मिळत नाही. यातच जुळवून ठेवलेली लग्न किती दिवस ठेवायची त्यामुळे लग्न उरकण्यावर भर दिला जात आहे. हे करताना मुहूर्ताकडे दुर्लक्ष करून गौण मुहूर्त, पर्यायी मुहूर्त अशी पळवाट शोधत आषाढातही शुभमंगल धुमधडाक्यात केले जात आहे.
आषाढात शुभ तारखा - चातुर्मासात लग्नकार्य निषिद्धच
धर्मबंधन न पाळण्याची नास्तिक वृत्ती वाढत आहे. स्वैर आचरणाला कोण रोखू शकतो? अत्यावश्यक बाबींमध्ये शास्त्री आषाढात परवानगी देऊ शकतात. अत्यंत अडचणी असतील तरच अशा प्रसंगी निषिद्ध कालातील किंवा गौण काळातील मुहूर्ताचाही पंचांगकर्त्यांनी विचार केलेला आहे. - एकनाथ पुजारी, बीड.
-------
आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिद्ध मानला गेला आहे. प्राचीन पंचांगामध्ये या तिथी नव्हत्या. आषाढ शुद्ध नवमी पर्यंत कठीण प्रसंगी काही मुहूर्त ग्राह्य धरले जातात. लग्नासाठी त्याचा आधार घेतला जातो. मात्र चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. चातुर्मासात न करता तुलसी विवाहानंतरच लग्न कार्य करायला हवे. - संतोष मुळे, बीड.
-----
मंगल कार्यालये बुक
चातुर्मासत २२, २५, २६, २८, २९ जुलै असे गौण मुहूर्त आहेत. पंचागाला मानणारे चातुर्मासात लग्नकार्य करत नाहीत. परंतु बदलत्या परिस्थितीत विविध पद्धतीने पर्यायी मुहूर्त काढून लग्नसोहळे केले जात आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हौशी आयोजक विवाहासाठी मंगल कार्यालय, केटरिंग, बँड बुकिंग करत आहेत. तुरळक तारखा असल्याने व पावसाळ्यात अडचणी नकोत म्हणून बहुतांश मंगल कार्यालयेदेखील या कालावधीत आरक्षित आहेत.
---------
परवानगी ५० चीच, पण...
विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. पन्नास लोकांना परवानगी आहे. विवाह आयोजन करताना विविध अटी प्रशासनाने ठरवून दिल्या आहेत. या अटींचे पालन करून विवाह करणे आवश्यक आहे. मात्र पन्नासऐवजी १० ते २० पट गर्दी जमवून विवाह सोहळे होत आहेत. काही ठिकाणी होणाऱ्या विवाहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तर काही ठिकाणी प्रशासनाकडून कारवायाही झाल्या आहेत.