पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:34 IST2019-10-27T00:34:16+5:302019-10-27T00:34:40+5:30
परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पीकनुकसानीबाबत नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले

पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पीकनुकसानीबाबत नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत.
यावर्षी दुष्काळाची छाया कायम असताना अल्प पावसावर केलेल्या पेरण्यानंतर हाती आलेली पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत. कापूस, बाजरी, तूर, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले असल्याने तातडीने पंचनामे करुन मदत करण्यात यावी, अशा सूचना आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी बीड आणि शिरुर कासारच्या तहसीलदारांना पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत तत्काळ नियमानुसार कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे पत्र दिले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांचे निर्देश मिळालेले आहेत. सध्या पावसामुळे शेतांमध्ये जाण्यायोग्य परिस्थिती नाही. दिवाळी सुटी संपताच तहसील यंत्रणा पंचनामे करणार असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.