स्कूल बस चालकही आले अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:27+5:302021-07-15T04:23:27+5:30
अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत ...
अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे मिळेल ते काम करून पोट भरत आहेत. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॉ. अजय बुरांडे यांनी केली आहे.
-------------------------
पांदण रस्त्यांवर अतिक्रमण
अंबाजोगाई : तालुक्यातील काही पांदण रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी या रस्त्यांवरच अतिक्रमण केले आहे. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपे वाढली. अतिक्रमण केल्याने पांदण रस्ते गायब झाले. त्यामुळे पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
---------------------------
व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील काही परिसरामध्ये लावण्यात आलेल्या व्यायाम शाळेतील साहित्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या साहित्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----------------------------
मजूर संस्था आल्या संकटात
अंबाजोगाई : बेरोजगार मजूर संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तरी या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काम मिळेल या आशेने मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी या संस्थांकडे नोंदणी केली आहे.
------------------------------
मेस चालकांचे आर्थिक नुकसान
अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण तसेच काही व्यवसाय अजूनही ठप्पच आहेत. त्यामुळे मेस चालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांना ग्राहकच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आता शाळा, महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
--------------------------------
विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमधील काही वस्त्यांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झालेला नाही. या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांना विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे वीज नसल्याने त्यांना दुसऱ्याच्या घरून वीज घ्यावी लागत आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने वीज मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी रिपाइं महिला आघाडीच्या बीड जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.