शिरूर तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:26+5:302021-07-15T04:23:26+5:30
विजयकुमार गाडेकर शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मोठा दिलासा मिळत आहे. ६२ गावे कोरोनामुक्त झाली असून, शहरासह ...
विजयकुमार गाडेकर शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मोठा दिलासा मिळत आहे. ६२ गावे कोरोनामुक्त झाली असून, शहरासह तेरा गावांत दहा दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण निघाला, तर उर्वरित वीस गावांत रुग्णसंख्येचे प्रमाण दोन ते सातपर्यंत इतके आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त एक जुलै ते दहा जुलैपर्यंतच्या अहवालानुसार हे चित्र स्पष्टपणे दिसून येते. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झालेली दिसत असली, तरी तो अजून संपला नसल्याचेही दिसून येत असल्याने गाफील राहून चालणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यात ६८ जणांना प्राण गमवावा लागला. तालुक्यात ९५ गावे असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १ लाख २८ हजार होती. ती आता जवळपास १ लाख ४० हजारांपर्यंत गेली असेल. सर्वच गावांत कमी-अधिक प्रमाणात कोरोनाला हटविण्यासाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी कसरत केली. जमेल तसे या कोरोना कुरुक्षेत्रावर बाजी लावली. सध्या दिलासा मिळत असला तरी, भीती मात्र कायम असल्याने अजूनही सावध राहण्याची गरज आहे. एक ते दहा जुलैपर्यंत कोरोना अहवाल पाहता, ३३ गावांतून कोरोना अजूनही गेलेला नाही, हे स्पष्ट होते. दहा दिवसांच्या कालावधीत तालुक्यात ८८ रुग्ण निघाले.
एक रुग्ण आढळलेली गावे :
शिरूर, आव्हळवाडी, वंजारवाडी, विघनवाडी, घा. पारगाव, मातोरी, आर्वी, पाडळी, आनंदगाव, पिंपळनेर, फुलसांगवी, भानकवाडी व नागरेवाडी.
दोन रुग्ण आढळलेली गावे :
पौंडूळ, मानूर, बरगवाडी, खरगवाडी, खांबा, गोमळवाडा, टेंभुर्णी व बोरगाव चकला या गावांत दोन बाधित निघाले.
सहा रुग्ण आढळलेली गावे :
रायमोह, धनगरवाडी, तरडगव्हण, झापेवाडीत तीन, हिवरसिंगा चार, तागडगाव, तिंतरवणी पाच, लोणी राळेसांगवी व खालापुरीमध्ये सहा बाधित रुग्ण निघाले, तर वारणी व खोकरमोहा येथे सर्वाधिक म्हणजे सात कोरोना रुग्ण निघाले असल्याचे दिसून येते.
सावधगिरी आवश्यक
सर्वांच्या सहकार्यामुळे आता कुठे रुग्णसंख्येत घट झाली असून, कोरोनाकाळात अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासन, प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळेच तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. तो मुक्त होण्यासाठी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे संयुक्तिक आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे, पो. नि. सिद्धार्थ माने, स.पो.नि. डॉ. रामचंद्र पवार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक गवळी यांनी केले आहे.
☰
Template
Image Attachment
Photo Manager
Social Media
Metadata
Attach Document
Translate
Backup
Agency
QrCode
Attch Audio/Video
Words : 1
Characters : 0