बीड जिल्ह्यात व्हायरल फिव्हरचा ‘कहर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:30 AM2018-10-29T00:30:26+5:302018-10-29T00:35:07+5:30

बाल रुग्णालये तर हाउसफुल्ल असून अशी परिस्थिती आणखी तीन महिने राहण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.

Viral Fever's 'Kahar' in Beed district | बीड जिल्ह्यात व्हायरल फिव्हरचा ‘कहर’

बीड जिल्ह्यात व्हायरल फिव्हरचा ‘कहर’

googlenewsNext
ठळक मुद्देविषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्दी, तापेचे तसेच डेंग्यूसदृष्य आजाराच्या रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले असून शहरासह जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्दी, तापेचे तसेच डेंग्यूसदृष्य आजाराच्या रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. बाल रुग्णालये तर हाउसफुल्ल असून अशी परिस्थिती आणखी तीन महिने राहण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.
जिल्ह्यात यावर्षी पाऊसप्रमाण कमी राहिलेले आहे. जुलै, आॅगस्टमध्ये काही दिवस ग्रामीण आणि शहरी भागात तापेची साथ पसरत होती. डेंग्यूच्या रुग्णांमध्येही भर पडली. डेंग्यूमुळे आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाय योजना करण्यात आल्या. अस्वच्छता, पाणी साठे यामुळे डासांचा उच्छाद होत राहिला. सप्टेंबरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असताना आॅक्टोबरपासून मात्र पुन्हा साथरोगांनी डोके वर काढले आहे. सर्दी, ताप, मलेरिया, डेंग्यूसदृष्य आजारांचा फैलाव होत राहिला. व्हायरल फीव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रुग्ण कमी असल्याने शांत रुग्णालये पुन्हा व्हायरलच्या रुग्णांमुळे गजबजली आहेत.
बीड शहरातील बाल रुग्णालयांमध्येया आठवड्यात रुग्ण संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. सर्दी, तापेचे हे रुग्ण आहेत. ताप आणि पुरळ असणारे (रॅश विथ फीवर) रुग्णही उपचारासाठी येत आहेत. अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून येत आहेत. बहुतांश रुग्णांच्या रक्त तपासणीत प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळून आल्याने खाजगी रुग्णालये खचाखच भरली आहेत. रात्री - बेरात्री येणाऱ्या रुग्णाची स्थिती लक्षात घेता भरती करण्याची गरज असतानाही केवळ बेड, खोलीअभावी इतर रुग्णालयांकडे जाण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. या आजारांमुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आवश्यक ते उपचार केले जात असल्याचे खाजगी तथा सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सांगितले.

वातावरणातील बदलाचे कारण
यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे उष्णता वाढलेली आहे. दिवसा तीव्र उन आणि रात्री थंडी असे वातावरण व्हायरल फिव्हरसाठी पोषक असते. आॅक्टोबरमध्ये वातावरणातील बदलामुळे सर्दी, तापेच्या आजार बळावले आहेत.

सतर्क रहा, सहकार्य करा
बीड शहरात विविध साथरोगांची शक्यता लक्षात घेत यावर नियंत्रण राखण्यासाठी अ‍ॅबेटींग, धूर फवारणी, गप्पी मासे सोडणे आदी उपाय केले जात आहेत. बीड तालुक्यात जवळपास ३०० ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. तर अ‍ॅबेटींगच्या दोन फेºया पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. व्हायरल फीवरचा प्रभाव साधारण आठवडाभर असतो, असे बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. कासट यांनी सांगितले.

स्वार्ईनवर ‘टॅमीफ्ल्यू’
सर्दी, ताप, खोकला यातून स्वाईन फ्ल्यूची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडून त्वरित उपचार करुन घेणे आवश्यक आहे. स्वाईनच्या नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात टॅमीफ्ल्यू गोळ्या तसेच सायरप मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

स्क्रब टायफस, स्वाईन आणि डेंग्यू
ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तसेच शहरातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता सर्दी, तापेबरोबरच स्क्रब टायफसचे (गोचिड ताप) रुग्णही आढळत आहेत, हे प्रमाण सध्या कमी असलेतरी ते वाढू नयेत म्हणून वैद्यकीय उपचाराबरोबरच हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत: सजग राहण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच स्वाईन फ्ल्यूसदृष्य रुग्णही आढळत आहेत.

संभाव्य साथरोगांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यात कंटेनर सर्वे करुन कोरडे केले जात आहेत. आरोग्य कर्मचा-यांकडून अ‍ॅबेटींग धूरफवारणीसह सर्वेक्षण सुरु आहे. ८०० पेक्षा जास्त ठिंकाणी गप्पी मासे सोडले आहेत. शाळकरी मुलांमध्ये व्हारल फीवरचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. वैयक्तिक काळजी घेणे हिताचे ठरेल. हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, साधी सर्दी समजून दिवस न काढता तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करुन घेणे उचित ठरते. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. - डॉ. संजय कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

पॅथॉलाजी लॅबचालकांची चांदी
रुग्ण आला की पहिल्या तपासणीनंतर गरजेनुसार रक्तातील घटक तपासण्याचा सल्ला दिला जातो. काही रुग्णालयात गरजेपेक्षा जास्त तपासण्या सांगण्यात येतात. रुग्णाचे पालक, नातेवाईक गरज म्हणून तपासण्या करवून घेतात. परंतु काही तपासण्याचे दर रुग्णांसाठी भूर्दंडच ठरत आहेत. त्यामुळे सध्या पॅथॉलॉजी लॅबचालकांची चांदी होत आहे.

मोबाईलमुळे फिरायला जाणे, मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बदलत्या लाईफ स्टाईलमुळे प्रतिकारशक्तीवरही परिणाम होत आहे. विषाणूजन्य आजार लवकर बळावतात, वैयक्तिक काळजी घेणेच महत्वाचे.
- डॉ. लक्ष्मीकांत तांदळे
वैद्यकीय अधिकारी, पाटोदा

Web Title: Viral Fever's 'Kahar' in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.