बंद पथदिव्यांना सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:17+5:302021-07-14T04:38:17+5:30
संरक्षक कठड्याची गरज आष्टी : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक ...
संरक्षक कठड्याची गरज
आष्टी : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणावर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फवारणीची कामे सुरू
शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने पिकांवर औषध फवारणीसह तणनाशक फवारणीची कामे सुरू आहेत. मागील दोन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला आहे. आता पिकांवरील कीड टाळण्यासाठी आवश्यक औषधींची फवारणी शेतकरी करीत आहेत.
राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बीड : नगर परिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणे करण्यात येत आहे. शहराच्या काही भागांत तीन दिवसाआड आणि तेही सात ते आठ तास, तर काही भागांत बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.