रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:00 AM2022-12-14T07:00:00+5:302022-12-14T07:00:01+5:30

कुंभकर्ण आपल्याला फक्त झोपेसाठी माहित आहे, परंतु तो अतिशय पराक्रमी होता. मात्र आळसामुळे त्याच्या पराक्रमाच्या कथा झाकोळल्या गेल्या!

Although Kumbhakarna was freed from the curse during the Ramayana period, a part of it still remains! | रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे!

रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे!

googlenewsNext

झोपाळू माणसाला आपण कुंभकर्ण म्हणतो. त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ. तो जन्मत:च महाकाय होता. पर्वतासारख्या शरीराच्या कुंभकर्णाने जन्म होताच एक हजार राक्षसांना खाल्ले. इंद्र ऐरावतावर बसून याच्या अंगावर फिरला, त्याला वज्राने मारले तरी कुंभकर्णाला काही झाले नाही. उलट त्याने ऐरावताचा एक दात उपटला. तेव्हा इंद्र पळून गेला. आणि ब्रह्मदेवाला आपली रक्षा करण्याची विनंती केली. 
ब्रह्मदेव म्हणाले, `इंद्रदेवा, कुंभकर्णाचा उपद्रव वाढला आहे, त्याला शांत ठेवण्याचा पर्याय म्हणजे त्याला निद्राधीन करणे. त्याच्या दुष्कृत्याचे फळ म्हणून मी त्याला कायम झोपलेला राहशील, असा शाप देतो.'

रावणाला हे समजताच त्याने ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि आपल्या भावाला उ:शाप देण्याची विनंती केली. परंतु, कुंभकर्णाचे प्रताप पाहता, त्याला सहा महिन्यांनी एकदाच जाग येईल, असा ब्रह्मदेवांनी उ:शाप दिला. त्यानुसार सहा महिन्यांनी एकदा कुंभकर्णाला जाग येऊ लागली. तो एक दिवस कुंभकर्ण मौज मजेत, आनंद, विलास, मदिरापान, नृत्य गायन ऐकण्यात घालवित असे.

हनुमंत सीतेला नेण्यासाठी लंकेत आले, तेव्हा योगायोगाने कुंभकर्ण जागा होता. हनुमंताचे प्रताप, रामचंद्रांचे सामर्थ्य, सीतेचे अपहरण आणि रावणाचे दुष्कृत्य कळल्यावर कुंभकर्णानेदेखील रावणाला सीतेला परत देण्याचा सल्ला दिला होता. परंतु, रावणाने त्याचे ऐकले नाही. कुंभकर्ण सवयीप्रमाणे झोपून गेला. 

राम आणि रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले, तेव्हा रथी-महारथी रणांगणावर प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. युद्धात दोन्ही बाजूच्या वीरांना वीरमरण येत होते. आपल्याकडचे एक एक योद्धा कमी होत असल्याचे पाहून रावणाने कुंभकर्णाला उठवायचे ठरवले. 

कुंभकर्णाला उठवणे सोपे काम नव्हते. बलाढ्य शरीराच्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सैनिक जवळ गेले असता, त्याच्या श्वासोच्छासाने उडून धारातिर्थी पडत असत. त्याचे घोरणे ऐकून सैनिकांना कानठळ्या बसत असत. राक्षसांनी कुंभकर्णाच्या अंगावरून हत्ती फिरवले. रणगाडे वाजवले. तोफा झाडल्या. तरी कुंभकर्णाला जाग येईना. 

अखेर कुंभकर्णाची झोपमोड झाली. तो खूप चिडला. रागाराागात रावणाची भेट घेतली. कुंभकर्णाने पुन्हा एकदा सीतेला परत पाठववण्याचा सल्ला दिला. परंतु, रावणाला तो सल्ला रूचला नाही. अखेर भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंभकर्ण युद्धभूमीवर उतरला. 

या विशाल देहाशी युद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धीदेखील तसाच हवा. म्हणून मारुतीररायाने महाकाय रूप धारण केले आणि कुंभकर्णाशी युद्ध केले. एका क्षणी तो धारातिर्थी पडला. त्याने प्रभू रामचंद्रांना शेवटचा नमस्कार केला. अशा रितीने कुंभकर्ण शापमुक्त आणि भवसागरातूनही मुक्त झाला. परंतु, आपल्यातला कुंभकर्ण अजुनही शिल्लक आहे. जो कठीण प्रसंगातही अजगरासारखा सुस्त पडून आहे. त्याला आता जागे करण्याची वेळ आली आहे. 

Web Title: Although Kumbhakarna was freed from the curse during the Ramayana period, a part of it still remains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण