जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:04 AM2020-08-17T02:04:14+5:302020-08-17T15:27:36+5:30

मानवी जीवनातली निस्सीम प्रेमभावना

Erase the question of survival | जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!

googlenewsNext

माणसाचे जीवन हे एका सुंदर प्रवासाने गुंफलेले असते. फक्त माणूस सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली पुरता दबून जात नवनवीन दुःखाची पेरणी करतो. मानवाच्या आयुष्यात क्रमाने येणाऱ्या बालपण, यौवन,गृहस्थ आणि वृद्धपणा ह्या चार अवस्था आहेत. पैकी पहिल्या तीन अवस्था जगताना माणूस उत्साहात असतो कारण त्या अवस्थात त्याच्या जीवनात रोज काहीना काही नवीन घडत असतं किंवा नवीन काहीतरी घडवण्याच्या उमेदीत तो असतो. तोपर्यंत त्याला जीवन जगायची असोशी असते. 

साठीच्या पुढे ज्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतं तोही तसा उत्साहात असतो. कारण त्याला पूर्वी नोकरीमुळे मोकळा वेळ मिळालेला नसल्याने देशांतर्गत पर्यटन , परदेशवारी करायला वेळ मिळालेला नसतो पण आता त्याला ते शक्य असतं. हे सगळं पासष्टीपर्यंत उरकतं. मग मात्र रिकामा वेळ त्याला खायला उठतो. हळूहळू प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात आणि मग गाडी हळूहळू उताराला लागते. उतरत्या वयात आरोग्याची साथ मिळेनाशी होते. तसेच हळूहळू घरातले महत्वही कमी होत जाते. मत विचारात न घेता परस्पर महत्वाचे निर्णय घेतले जातात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मनुष्य हळूहळू जीवनाला कंटाळू लागतो.. पण म्हणून काही जगणे सोडता येत नाही. आयुष्य आहे तोवर जगावेच लागते पण ती एक कंटाळवाणी यात्रा ठरते. शेवटीशेवटी तर कधी सुटका होईल असे वाटत राहते.

 जीवन उत्साहानं जगण्यासाठी माणसासमोर काहीतरी ध्येय,आव्हान असणे नेहमीच गरजेचे आहे. कारण आव्हानाची पूर्तता करण्यात माणूस गुंतून पडतो. पण म्हातारपणी माणसापुढे एकदम असे आव्हान कसे उभे राहील ? म्हणजे असे आव्हान कोणते ते हुडकण्याची तयारी जो पूर्वायुष्यात करेल त्याला उत्तरायुष्यात त्या आव्हानाचा सामना करण्यात वेळ चांगला गेल्यामुळे कंटाळा येणार नाही. उलट त्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढता राहील. 

माणूस ही भगवंतांचीच निर्मिती असल्याने माणसाला आयुष्याचा कंटाळा येऊ नये यादृष्टीने स्वच्या स्वरूपाचा शोध हे आव्हान भगवंतांनी त्याच्यापुढे उभे केले आहे पण भगवंत ज्याप्रमाणे प्रकृतीत म्हणजेच त्यांच्याच मायाशक्तीत गुंतून पडून एकाचे अनेक झालेत त्याप्रमाणे मनुष्य हाही भगवंतांचा अंश असल्याने मोहमायेच्या जंजाळात गुंतून स्वतःचं मूळ स्वरूप विसरून स्वतःभोवतीची आवरणं वाढवत जातो. जीवनामध्ये जेवढ्या लवकर हा गुंता लक्षात येईल तितक्या तीव्रतेने मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आणि तो गुंता सोडवण्यातला आनंद घेत घेत कधी अंतिम समय आला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. अखेरपर्यंत तो स्वतःवर प्रेम करत जगण्यातला आनंद मिळवत जातो.

 स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जाते मग त्यात त्याला वाढतं वय , प्रकृती , समाजातील उपेक्षा या कशाचाही अडथळा जाणवत नाही आणि मग तो म्हणत राहतो या जन्मावर शतदा प्रेम करावे...!

Web Title: Erase the question of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.