Ganesh Chaturthi 2023: बाप्पा सगळ्यांचा लाडका का? यामागील असंख्य कारणांपैकी 'हे' आहे मुख्य कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:45 AM2023-09-08T11:45:48+5:302023-09-08T11:47:19+5:30

Ganesh Festival 2023: ज्यांना लोकप्रिय व्हायचे असेल त्यांनी बाप्पाचा आदर्श ठेवायला हवा; त्यासाठी वाचा बाप्पाच्या लोकप्रियतेचे कारण!

Ganesh Chaturthi 2023: Why is Bappa everyone's favorite? Among the numerous reasons behind this 'this' is the main reason! | Ganesh Chaturthi 2023: बाप्पा सगळ्यांचा लाडका का? यामागील असंख्य कारणांपैकी 'हे' आहे मुख्य कारण!

Ganesh Chaturthi 2023: बाप्पा सगळ्यांचा लाडका का? यामागील असंख्य कारणांपैकी 'हे' आहे मुख्य कारण!

googlenewsNext

'आमच्या पप्पांनी गंपती आणला' हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. छोट्याशा मुलाला बाप्पाबद्दल वाटणारं प्रेम घरातल्या बड्या बुजुर्गांनाही वाटते. एकच व्यक्ती, एकच देवता सगळ्यांचीच लाडकी असण्यामागे काय आहे कारण? या प्रचलित कथेतून जाणून घेऊ. गोष्ट माहितीची असली तरी शेवटी त्याचा आशय आणि बाप्पाच्या लोकप्रियतेचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे!

एके दिवशी सकाळी दोघे जण खेळत बसले होते. आता कोणता नवीन खेळ खेळायचा, याचा ते विचार करू लागले. दोघांना काही सुचेना. मग त्यांनी आईकडे 'खेळ सुचव' म्हणत तगादा लावला. आईला आपली कामे उरकायची होती. बाबा त्यांच्या कामात होते. अशा वेळी दोन्ही मुलांना जास्त वेळ खेळात अडकवून ठेवण्यासाठी आईने दोघांमध्ये स्पर्धा लावली. 'दोघांपैकी जो पहिले पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करेल, तो विजयी.' 

दोघांनी उत्साहाने माना डोलावल्या. पार्वती मातेने स्पर्धेचा झेंडा उंचावला आणि शर्यतीला सुरुवात करून दिली. कार्तिकेय स्वामींचा मोर तयारीतच होता. त्याच्यावर स्वार होऊन कार्तिकेय स्वामी पृथ्वीप्रदक्षिणेला निघाले. उंदिरराव गणाधिपतींच्या सूचनेची वाट बघत हात जोडून सेवेत बसले होते. मात्र, गणोबाच्या चेहऱ्यावर शर्यत जिंकण्यासाठी कुठलीच घाईगर्दी दिसत नव्हती. उलट, कार्तिकेय दादा बाहेर गेल्यावर ते मोदकपात्र घेऊन एकटे सेवन करायला बसले. पार्वती मातेला हसू आले. तिने विचारलेही, 'गणू, स्पर्धेत हरायचे आहे का?'

'नाही गं आई, स्पर्धा तर मीच जिंकणार, तू नको काळजी करूस. तुझी कामं आवरून घे, मी निवांत मोदक खात बसतो.' 

पार्वती माता, तिच्या कामाला निघून गेली. कार्तिकेय स्वामींची अर्धी पृथ्वी पालथी घालून झाली. गणोबाने सॅटेलाईटच्या मदतीने कार्तिकेय स्वामींचे लोकेशन ट्रॅक केले. 

एव्हाना पार्वती माता आणि देवाधिदेव महादेव आपली कामे उरकून कैलासावर गप्पा मारत बसले होते. दुपारचे भोजन घेण्यासाठी कार्तिकेयाच्या येण्याची वाट बघत होते. गणोबाने पुन्हा एकदा कार्तिकेय दादा कुठवर आलेत, हे तपासून पाहिले. स्पर्धेच्या अटीनुसार पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून ते आनंदाच्या भरात कैलासावर येताना दिसले.  

बाप्पाने लगेच उठून बाप्पाने आई-बाबा बसलेल्या आसनाभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्यांना नमस्कार केला. आपल्याआधी गणोबाला कैलासावर आलेले पाहून कार्तिकेय स्वामी गोंधळले. आपण हरलो, या विचाराने नाराज झाले. तरीदेखील स्पर्धेचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मातेकडे विचारणा केली. पार्वती मातेने, महादेवांना निकाल जाहीर करण्यास सांगितले. कैलासावर उपस्थित नंदी महाराज आणि शिवगणदेखील निकाल ऐकण्यास उत्सुक होते. दोन्ही स्पर्धकांकडे आलटून पालटून पाहत, महादेवांनी निकाल जाहीर केला आणि विजेता आहे....बालगणेश!!!

निकाल ऐकून कार्तिकेय स्वामी हिरमुसले, परंतु पुढल्याच क्षणी त्यांनी तावातावाने 'असं कसं, असं कसं' म्हणत विचारणा केली. गणोबाच्या निकालावर शंका उपस्थित केली. आपण किती परिश्रमाने स्पर्धा पूर्ण केली, याचाही हिशोब मांडला. त्यावर शांतपणे उत्तर देत गणोबा म्हणाले, 

'दादा, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केलीस. पण त्यासाठी फार श्रम घेतलेस. प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही, तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात. तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून येत असल्याचे पाहून मी आपल्या आई-बाबांना प्रदक्षिणा मारली. कारण, आपल्या पालकांमध्ये आपले विश्व सामावले आहे. शिवाय पृथ्वी म्हणजे शक्ती आणि आई ही शक्तीस्वरूप असते. मग तिला प्रदक्षिणा मारली काय किंवा खऱ्याखुऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली काय, एकच!'

गणोबाची हुशारी बघून कार्तिकेय स्वामींना हसू आले आणि त्यांनीही आई-वडिलांबरोबर गणोबाला प्रथम येण्याचा मान अर्पण केला. जग जिंकण्याआधी आपल्या आई वडिलांच आणि घरच्यांचं मन जिंकता येणं महत्त्वाचं आहे. त्यांना आदर दिला तर ते आपल्याला शुभाशीर्वाद देतील. त्यांच्या शुभेच्छांच्या बळावर जग जिंकता येते आणि यदाकदाचित जग विरोधात गेले तरी घरच्यांचा भक्कम पाठिंबा असणं हे यशाचं खरं गमक आहे हे बाप्पाने आपल्या कृतीतून दाखवून दिल!

म्हणून समर्थ रामदास स्वामींनीदेखील, मनाचे श्लोक लिहित असताना सर्वप्रथम 'मनाला' बाप्पाच्या हुशारीचा बोध दिला. तोच बोध घेऊन आपणही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ध्यानात ठेवून आपल्या आयुष्यातील स्पर्धा जिंकूया. बाप्पा मोरया...! 

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा।।

Web Title: Ganesh Chaturthi 2023: Why is Bappa everyone's favorite? Among the numerous reasons behind this 'this' is the main reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.