Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:12 AM2024-09-06T11:12:37+5:302024-09-06T11:13:04+5:30

Ganesh Chaturthi 2024: ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे, बाप्पा मोठ्या ओढीने आणि गोडीने भक्तांच्या भेटीला येतो, त्यावेळी आपले आचरण कसे हवे हे सांगणारा लेख!

Ganesh Chaturthi 2024: Let's be careful in Ganesh Chaturthi that our behavior does not disappoint the Ganesha! | Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी!

Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी!

>> अस्मिता दीक्षित 

भाद्रपद मनावर दस्तक देतो आणि वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024) बाप्पाचे आगमन होत आहे. कधी एकदा डोळेभरून त्याला पाहतो असे प्रत्येकाला झालेले असते.  ह्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची ओढ चराचर सृष्टीला लागलेली असते.  आपले गणपती बाप्पा माझ्या बालपणीच्या स्मृती नेहमीच जागृत करतात. आम्ही लहान असताना तर अगदी घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. आम्ही बाळगोपाळ मंडळीही खूप होतो पण जिथे आवडीचे प्रसाद तिथे आमचा मोर्च्या आवडीने जायचा. आरत्या पाठ नसायच्या मग त्यावरून ओरडा आणि धपाटे सुद्धा मिळायचे. आज रस्त्यावरून फेरफटका मारताना मूर्तिकार गणपतीच्या सुंदर मूर्तीं साकारताना दिसत आहेत . ज्यांना ही कला अवगत आहे त्यांच्यावर ह्या द्धिविनायकाची केवढी कृपा असेल हा विचार मनाला नकळत स्पर्शून जातो. 

दर वर्षी आपल्याला बाप्पा भेटायला येतात . कोकणात आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेन , बस जे मिळेल त्याने जाण्यासाठी भाविक उत्सुक असतात . कोकणातील आणि शहरातील गणेश उत्सवाचे  चित्र अर्थात थोडे वेगळे असतेच . गणेश चतुर्थीच्या निम्मित्ताने शाळांना सुट्टी असते त्यामुळे मुलेही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत हातभार लावतात . प्रत्येक जण देहभान विसरून गणेशमय झाल्याने हा उत्सव असूनही त्याला सोहळ्याचे स्वरूप येते.
 
गणपतीची प्रतिष्ठापना , त्याची षोडशोपचारे केलेली पूजा आणि नेवैद्य घरातील वातावरणाला चारचांद लावतात. तनमन अर्पण करून त्याची मनोभावे पूजा केली तर तो आपल्याला चांगली बुद्धी देतो असे आजी लहानपणी गोष्टी सांगताना म्हणायची . बाप्पाला हात जोडले की मगच अभ्यास येतो आणि मार्क चांगले मिळतात हे सांगताना कुठेतरी श्री गणेश हे आपले दैवत आहे आणि त्याचे पूजन आयुष्य बदलून टाकते हेच बाळकडू पाजले जात असे. 

आधुनिक काळात ह्या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे . टिळकांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे आणि एकजूट वाढावी म्हणून गणेशोत्सव सुरु केला पण त्याचा मूळ उद्देश आज लोप पावलाय ही वस्तुस्थिती आहे. आजचा गणेशोत्सव म्हणजे मोठमोठे मांडव , कर्कश्य वाजणारे संगीत , हिडीस नाचगाणी , पैशाचा अपव्यय , मानहानी , मोठेपणा आणि बरच काही आहे. 

सिद्धीविनायकाचा महिमा खरच आपल्याला समजलाय का? प्रत्येक शुभ कार्याची सुरवात आपण श्री गणेशा पासून करतो अगदी प्रत्येक वेळी “ श्री गणेश “ लिहून आरंभ करतो . गणेशाची आराधना आपले आयुष्य समृद्ध करते , आपल्याला चांगली बुद्धी देवून कुशाग्र बनवते आणि म्हणूनच लहान मुलांवर आपण गणपती स्तोत्र , गणेश वंदना , अथर्व शीर्ष म्हणण्याचे धडे गिरवायला सांगून हिंदू संस्कृतीचे जतन करतो . पण हे सर्व करत असताना त्याचा अर्थ समजून घेतो का? मुले घरात अथर्व शीर्ष म्हणतील आणि बाहेर जावून मिरवणुकीत नाचतील , मग काय समजले आपल्याला ह्या उत्सवाचे मोल आणि मर्म ? 

काळ बदलला आहे हो ह्या गोंडस संज्ञेखाली आपण काहीही चालवून घेत आहोत . इतके मोठे लाउड स्पीकर , वेळप्रसंगी सरकारने घातलेले नियम मोडून सुद्धा चालू असतात . कुणी आजारी आहे , लहान मुले आहेत त्यानाही त्रास होतो आहे ह्याचे भान कुठे आहे ? ११ दिवस आपल्या मंडपात गुपचूप हे सर्व सहन करणाऱ्या मोरेश्वराला कधीतरी आपण विचारले का? बाबारे तुला हे सर्व आवडतंय का? तुला त्रास होतोय का? तुझ्या कानठळ्या बसतात का? अहो तो हे सर्व बघून मनात म्हणत असेल सर्व भक्तांना भेटायला आलोय खरा त्यांच्यासोबत जरा दोन शब्द निवांत बसून शिळोप्याच्या गप्पा मारीन पण कसले काय आता जाताना बहिरा नाही झालो  म्हणजे मिळवले. 

टिळकांचा उद्देश सोडा आता तर ह्या उत्सवाचे हिडीस स्वरूप पाहून हा निव्वळ धंदा झालाय असेच वाटू लागले आहे. श्री गणेशावर प्रेम सर्वांचे सारखेच आहे मग सगळ्यांनी एकाच रांगेत दर्शन घ्या की! गणेशाला काय आवडते? प्रार्थना , सुकून , भक्ती; पण आजच्या उत्सवात खरच दिसते का ती आपल्याला? खरतर गणपती स्तोत्र शाळेच्या प्रार्थने बरोबर म्हंटले गेले पाहिजे निदान महाराष्ट्रात तरी . इतिहास भूगोल ह्यासोबत आपल्या संस्कृती ,आपल्या हिंदू देवदेवतांची माहिती आणि त्यांचा इतिहास , त्यांचे आपल्या हिंदू संस्कृतीत असणारे असामान्य महत्व ह्याची माहिती देणारे विशेष सत्र अगदी पहिली पासून सुरु केले पाहिजे.
 
मोरेश्वराचा हा उत्सव म्हणजे फक्त नाचगाणी , प्रसाद , मोठेपणा , पैशाचा अपव्यय नाही तर त्याहीपलीकडे खूप आहे हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . त्याचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील स्थान समजून घेतले पाहिजे . प्रत्येक मुलाला गणपती स्तोत्र , अथर्वशीर्ष यायला हवे , गणपती बुद्धीची  देवता आहे . आपली बुद्धी आज कुठे खर्च होत  आहे ? फाटक्या तोडक्या कपड्यात देहप्रदर्शन करण्यात ? . चोवीस तास मोबाईल मध्ये डोके खुपसून बसायचे, घरातील सकस अन्न सोडून बाहेर पिझ्झा बर्गर खात पाश्चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार केल्यासारखे वावरायचे हे आवडेल आपल्या गणरायाला . गेल्या वर्षी आलो होतो त्याही पेक्षा ह्या वर्षी अजूनच भयंकर स्थिती आहे आणि हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहत आहे असाच तर विचार बाप्पा आपल्या मनात करत नसेल ना? तो तुम्हाला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ह्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजात त्याचे शब्द आकाशातच विरून जात आहेत , ते आपल्यापर्यंत पोहोचताच नाहीत हे आपले दुर्दैव आहे. 

बाप्पाचा उत्सव आहे मग त्याला काय आवडते ? त्याला काय हवे आहे ? आपल्याला काय सांगण्यासाठी तो ११ दिवसा आपल्यात आलाय ? त्याला कधी विचारायचे कष्ट घेतले का आपण  ? ह्या ११ दिवसात कधी त्याच्यासोबत त्याचा हात धरून मनातले बोललो ? संवाद साधला ? त्याच्या कडे निदान क्षणभर तरी मनापसून पाहिले ?नाही .   सगळ्याचा बाजार मांडलाय आपण त्यात देवानाही सोडले नाही . सगळीकडे असे असतेच असे नाही . काही संस्कृतीत मंडळे आपली संस्कृती , परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात , कुठे मोदक करण्याच्या स्पर्धा तर कुठे अथर्वशीर्षाचे एकत्रित कार्यक्रम सुद्धा होतात , कुठे शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप होते . फक्त त्याचे प्रमाण हवे तितके नाही , जे वाढले पाहिजे . पाश्चिमात्य संस्कृती अजिबात वाईट नाही त्यांच्याकडून घेण्यासारखी असंख्य गोष्टी आहेत जसे त्यांची शिस्त , स्वछ्यता , कष्ट पण आपण ते घेत नाही . घेतो तर काय पिझ्झा , बर्गर . मोदक म्हणायला लाज वाटते पण मोमोज म्हणायला अगदी अभिमान वाटतो.

इतक्यावर थांबत नाही , ज्याची आराधना गेले ११ दिवस केली त्याची पाठवणी करताना शुद्धीत नसतो आपण . गणेशाचे विसर्जन हा सुद्धा मानाचा असतो , शास्त्रसुद्ध प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन होणे आवश्यक असते नव्हे तो गजाननाचा हक्क आहे पण आपण त्याच्या मूर्तीवर विसर्जनासाठी चक्क पाय देवून नाचतो त्याला पायाखाली तुडवतो .हृदय चिरून टाकणारी ही दृश पाहता गेले अकरा दिवस केलेली भक्ती अश्रूंच्या रुपात डोळ्यातून वाहून जाते . पुढील वर्षी न येण्याचा निर्णय त्याने घेतला तर तो आपल्याला कितीला पडेल विचार करा ? 

सृष्टीच्या निर्मात्याचे लक्ष आहे आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक कर्मावर . त्याचे येणे आपल्याला ज्ञान , बुद्धी , समाधान देणारे आहे . आज आपले जीवन अनेक त्रासातून जात आहे पण ह्या गणेशोत्सवाच्या निम्मित्ताने ११ दिवस आपण आपले दुःख विसरतो , आपल्या आप्तेष्टांना भेटतो , त्याच्या सेवेत राहतो पण ती सेवा करताना खरा शुद्ध भाव अपेक्षित आहे , ह्या हिडीस , किळसवाण्या प्रकारांची खरच गरज आहे का? 

खरे सांगा किती जणांना गणेशाची सगळी नावे पाठ आहेत ?  नुसते म्हणायचे म्हणून स्तोत्र म्हंटली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही . इतके उत्सव आले आणि गेले पुढेही होत राहतील पण ह्यात आपण किती बदललो , मला काय मिळाले ? मी विचारांनी किती प्रगल्भ झालो ? मी समाजाला काय दिले आणि माझ्या लाडक्या बाप्पाच्या चरणाशी मी काय अर्पण केले ? हे प्रश्न स्वतःलाच विचार बघा उत्तरे मिळतात का?

आम्हाला तो दर वर्षी बुद्धीच देतो, पण ती बुद्धी आम्ही कशी वापरतो? लहान मुले पळवून विकण्यासाठी ? स्त्रिया आज खरच सुरक्षित आहेत ? स्त्रियांवरचे अतिप्रसंग रोज घडतात , वृद्धाश्रमांचे प्रमाण आज वाढले आहे , तिथे चक्क वेटिंग असते , व्यसनाधीनता , आजार ह्यांचेही प्रमाण वाढत आहे . विवाह संस्था आणि एकंदरीत सामाजिक स्थिती कोलमडत चालली आहे. हे सर्व बघून बाप्पा सुद्धा मनात खिन्न होत असावा . आपल्याला तो देत असणाऱ्या सुबुद्धीचा उपयोग करून आपले आणि सर्वांचे आयुष्य मार्गस्थ करण्याची जबाबदारी आपल्यातील प्रत्येकाची आहे. चला तर मग सुरवात करूया स्वतःपासून!

भारतीय संस्कृती चा आपल्याला नक्कीच अभिमान आहे आणि सप्त खंडात  त्याचा जयघोष सुद्धा आहे .  आपल्या देवदेवतांचा जीवन जगण्यासाठी आधार आहे. हा वारसा आपल्याला पुढील पिढीकडे देताना , आपल्या संस्कृतीत असलेल्या सर्व गोष्टींचा अर्थ त्यांना समजला तर ते अधिक मनापासून करतील. हे ११ दिवस केलेली उपासना पूर्ण वर्ष आपल्याला सांभाळणार आहे . आज धकाधकीच्या जीवनात मनुष्याला नोकरी , घर इतके प्रश्न समोर उभे आहेत , त्यातून मार्ग काढण्यासाठी मिळणारी शक्ती आणि बुद्धी आपल्याला बाप्पाच देणार आहे. 

येणारा गणेश उत्सव सर्वाना सकारात्मकतेचा , सद्बुद्धी प्रदान करणारा , एका उत्तम आयुष्याकडे वाटचाल करणारा , प्रापंचिक अडचणीतू मार्ग दाखवणारा आणि भक्तिमार्गा  कडे नेणारा ठरावा .  आधुनिकतेच्या नावाखाली बदललेले उत्सवांचे स्वरूप आपल्या विचारांचेच प्रतिबिंब आहे , जे बदलणे गरजेचे आहे तुमच्या आमच्या आणि संपूर्ण मानवजातीसाठी . 

तुझ्याच प्रेरणेने हे लेखन केले आहे, काही कमी अधिक असल्यास पोटात घे आणि सर्वाना समाधान , सद्बुद्धी आणि आनंद दे.

संपर्क : 8104639230

Web Title: Ganesh Chaturthi 2024: Let's be careful in Ganesh Chaturthi that our behavior does not disappoint the Ganesha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.