सुख आणि समाधान मिळवण्यासाठी प्रत्येक संसारी व्यक्तीने लक्षात ठेवाव्या अशा महत्त्वाच्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 05:50 PM2023-06-15T17:50:02+5:302023-06-15T17:50:19+5:30

सुखाचा राजमार्ग कोणता, असे अनेक जण कुतूहलाने विचारतात, त्यावेळी आपल्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्यांनीच दिलेला निष्कर्ष!

Important things that every worldly person should remember to achieve happiness and contentment! | सुख आणि समाधान मिळवण्यासाठी प्रत्येक संसारी व्यक्तीने लक्षात ठेवाव्या अशा महत्त्वाच्या गोष्टी!

सुख आणि समाधान मिळवण्यासाठी प्रत्येक संसारी व्यक्तीने लक्षात ठेवाव्या अशा महत्त्वाच्या गोष्टी!

googlenewsNext

भारतात पूर्वापार तत्त्ववेत्यांची जणू खाणच होती, आजही आहे. अनेक ऋषीमुनींनी, तपस्वींनी, राजा महाराजांनी, धर्मप्रचारकांनी, अभ्यासकांनी आपल्या स्वानुभवातून आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी नियमावली घालून दिली. तिलाच आपण नीति असे म्हणता़े  भीष्म नीति, मनु नीति, चर्वाक नीति, शुक्र नीति, बृहस्पति नीति, परशुराम नीति, गर्ग नीति इ. नीतिज्ञ आपल्याकडे होऊन गेले. चाणक्य यांच्यानंतरही भर्तृहरी, हर्षवर्धन, बाणभट्ट यांची नीति अभ्यासली जाते. आज आपण विदुर नीति समजून घेणार आहोत.

विदुर हे महाभारतातील बुद्धिमान अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. ते धृतराष्ट्र आणि पांडु यांचे सावत्र भाऊ होते. तर कौरव आणि पांडवांचे काका होते. त्यांचा जन्म एका दासीच्या पोटी झाला. परंतु त्यांनी अथक मेहनत घेऊन ज्ञान प्राप्त केले आणि स्वत:ची ओळख बनवली. 

विदुर नीति म्हणजे महाभारताच्या युद्धपूर्वकाळात विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यात झालेला मार्मिक संवाद आहे. युद्धाचे भीषण पडसाद आपल्या दूरदृष्टीने ओळखून विदुराने केलेली चर्चा इतिहासात विदुर नीति म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा काही अंश पुढीलप्रमाणे-

  • जे धन मिळवताना तुम्हाला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, धर्माविरुद्ध आचरण करावे लागते, शत्रूशी लाचारी पत्करावी लागते, असे धन मिळूनही त्याचा उपयोग होत नाही, त्यापेक्षा त्याचा त्याग करणे योग्य!
  • परस्त्री आणि परधन यांचे आकर्षण षडरिपूंना आमंत्रित करते. त्याचा मोह ठेवू नये.
  • परमेश्वराव्यतिरिक्त अन्य कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. व्यक्ती आणि विचार कधीही बदलू शकतात.
  • संसार सुखासाठी फक्त पुरेशी धनप्राप्ती, निरोगी शरीर, पतिव्रता पत्नी, गुणी मुले, उत्पन्न मिळवून देईल असे शिक्षण किंवा कला आवश्यक असते़
  • क्षमा करण्यात दुर्बलता नसून, तुमच्या मनाचा मोठेपणा दर्शवणारा गुण आहे.
  • काम, क्रोध, लोभ नरकाकडे नेणारे मार्ग आहेत. त्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.    
  • दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करणारी, असंतुष्ट राहणारी, दुसऱ्याचा मत्सर करणारी, असूया करणारी व्यक्ती स्वत: आनंदी राहू शकत नाही आणि दुसऱ्याला आनंदी ठेवू शकत नाही.
  • जो यशाने फुलून जात नाही आणि अपयशाने खचून जात नाही, अशी व्यक्ती जीवनाचा उत्कर्ष साधू शकते.
  • ज्याच्याकडे धन, पैसा, संपत्ती, सौंदर्य असूनही अहंकार नाही, अशा व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख आपणहून प्राप्त होते.
  • दोन प्रकारचे लोक स्वर्गप्राप्ती करतात, जे बलवान असूनही दुसऱ्याला अभय देतात आणि जे गरीब असूनही दुसऱ्याला मदत करतात.
  • केवळ धर्म कल्याणकारक आहे. क्षमा हाच शांती मिळवण्याचा मार्ग आहे. विद्या समाधान देणारी बाब आहे, तर अहिंसा हा सुखाचा राजमार्ग आहे. 

Web Title: Important things that every worldly person should remember to achieve happiness and contentment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.