सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून झाला की उंबरठ्यावर हळद कुंकू वहा; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:42 PM2023-04-14T12:42:24+5:302023-04-14T12:42:59+5:30

देवाजवळ दिवा लावणे हा केवळ दैनंदिन उपचार नाही तर त्यामागे सखोल विचार आहे; जाणून घ्या माहिती आणि महत्त्व!

In the evening, after lighting a lamp near God and Tulsi, pour turmeric kunku on the threshold; Because... | सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून झाला की उंबरठ्यावर हळद कुंकू वहा; कारण... 

सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून झाला की उंबरठ्यावर हळद कुंकू वहा; कारण... 

googlenewsNext

आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो. पण तो का लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, कोणासाठी लावायचा, त्यामुळे काय फरक पडतो, या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे. त्या संदर्भात समाज माध्यमावर एक निनामी पोस्ट वाचण्यात आली, त्यात दिलेल्या माहितीला शास्त्राधार आहे आणि महत्त्व पटवून देणारा आहे. 

दिवा का लावावा? हे लक्षात आले कि मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे  जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसुक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. स्त्रियांच्या शरिरावरील रंध्रे ही पुरूषांच्या शरिरावरिल रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरिरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरिररचनेनुसार, स्त्रियांना जास्त धोका असतो. म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते. वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा,  सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते.

सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचण्ड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते.  त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही,  फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणार्या लहरींद्वारेच थोपवली जाते.  इलेक्ट्रीकल दिव्यांद्वारे निघणार्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही.

तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभं करोति ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’ 

सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते. 

ग्रामीण भागात दिवेलागण करण्याची वेळ आणि त्यामागील प्रथा: 

काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे. ज्याचा वार ठरलेला तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. 

त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पान होता, ग्रामदेवताला दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे. या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.

दिवा लावण्याची योग्य वेळ: 

संध्याकाळी ६.३० नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून  हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण  लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा. 

सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. 

दिवा लावण्याचे फायदे: 

देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते.

कातरवेळी दिवेलागण: 

स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते. ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.

दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी. दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर. या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा. आणि पूजा , दिवेलागण करा. 

आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी. दिवा सुर्योदया आधी आणि सुर्यास्ता नंतर लावावा...!!! कारण ती प्रकाशाची पुजा आहे.. त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणी प्रकाशाची पुजा म्हणजेच देवाची पुजा होय....!!!

Web Title: In the evening, after lighting a lamp near God and Tulsi, pour turmeric kunku on the threshold; Because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.