Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 10:16 AM2024-08-14T10:16:00+5:302024-08-14T10:18:30+5:30

Independence Day 2024: देशाची सर्वार्थाने प्रगती व्हावी असे प्रत्येक देशवासीयाला वाटते, पण ती नेमकी कशी करता येईल याचा कानमंत्र देत आहेत शिवानी दीदी.

Independence Day 2024: Every Indian must make 'this' change for an independent India!- Shivani Didi | Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी

Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी

१५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा करतो, पण हे स्वातंत्र्य नेमकं कशा बाबतीत सध्या हवं आहे, तेही समजून घ्यायला हवं.  संकटकाळी मनुष्य विचलित होतो. मात्र प्रख्यात शायर साहिर लुधियानवी म्हणतात, 'में जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया...' परंतु सद्यस्थितीत वाढता तणाव पाहता त्यावर मात करून देशाची प्रगती कशी साधता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत आंतराष्ट्रीय व्याख्याता ब्रह्मकुमारी शिवानी दीदी. 

दीदी म्हणतात, 'मनुष्य कालही आपल्या दुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार धरत होता, आजही दुसऱ्यालाच जबाबदार धरत आहे. कोव्हीड २०२० मध्ये आला, परंतु २०१९ मध्ये आपण डोकावलो, तर लक्षात येईल, की तेव्हाही मनुष्य त्रासलेलाच होता. याचे कारण एकच, मनुष्याला आपल्या दुःखाचे खापर फोडायला काही ना काही साधन लागते, २०२० मध्ये ते कोव्हीडच्या रूपात मिळाले. याचाच अर्थ अस्वस्थता वातावरणात नाही, तर मनुष्याच्या मनात आहे. त्याने स्वतःच्या यश-अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. त्यामुळे आपोआप त्याचे मन स्थिर होईल. शांत होईल. 

मनःशांती आपल्या आतच 'दडलेली' आहे, मात्र मनुष्याने तिला बाह्य कारणांनी 'दडपून' टाकले आहे.  ती कारणे बाजूला केली, की फक्त मनःशांती सापडेल. आनंद सापडेल. मग कोव्हीड येवो, नाहीतर अन्य कोणतीही समस्या, ती आपले चित्त विचलित करू शकत नाही. म्हणून मनाशी संकल्प केला पाहिजे, की मला कायम आनंदात राहायचे आहे आणि इतरांना आनंदात ठेवायचे आहे. या संकल्पात सिद्धी दडलेली आहे. आनंद बाहेरून शरीरात येत नाही, तर आतून बाहेर गेला पाहिजे. आपले विचार, संस्कार आपले भविष्य ठरवतात. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. चांगलेच विचार करा, आपोआप सगळे चांगलेच घडत जाईल. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्याचा विचार करू नका. मात्र, आपली कृती, उक्ती विचारपूर्वक करा. आपल्या संस्कारांवर उद्याचा समाज अवलंबून आहे. 

सद्यस्थितीत ही अस्वस्थता वाढून गुन्हेगारीत वाढ झालेली दिसते. कोणीही उठावे कोणाला मारावे, कपडे गुंडाळून न्यावे तशी बॉडी बॅगेत टाकून नाल्यात सोडून द्यावी....मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? मनावर ताबा नाही तर गाडीवर ताबा कुठून मिळणार? मग हिट ऍण्ड रन सारख्या केसेस वाढतच राहणार. घरगुती हिंसाचाराची पार्श्वभूमी तपासली तरीदेखील बिघडलेली मानसिकता हेच कारण दिसून येईल. जोवर समाज असा धुमसत राहील तोवर राष्ट्र धुमसत राहील. देशाची प्रगती खुंटून राहील. जर आपण स्वातंत्रोत्सव साजरा करतोय तर त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. शांतता, सबुरी ठेवायला हवी. सहृदयता जागृत करायला हवी. तरच आपण बालपणी म्हणत असलेल्या प्रतिज्ञेला अर्थ मिळेल. 'भारत 'माझा' देश आहे. सारे भारतीय 'माझे' बांधव आहेत. माझ्या देशावर 'माझे' प्रेम आहे. एरव्ही आपण माझं माझं करतो, आणि आपलं मानलेली गोष्ट मनापासून जपतो. आताही आपल्याला तेच करायचे आहे. देशाबद्दल आत्मीयता निर्माण करायची आहे. तरच मन शांत राहील, समाजात एकरूपता वाढेल आणि देश प्रगती पथावर जाईल!

Web Title: Independence Day 2024: Every Indian must make 'this' change for an independent India!- Shivani Didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.