Janmashtami 2024: वैवाहिक कलह मिटावेत म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तु उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:08 IST2024-08-21T12:06:51+5:302024-08-21T12:08:17+5:30
Janmashtami 2024: श्रीकृष्ण हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप, जर तुमच्या जीवनात प्रेमाचा अभाव असेल तर दिलेले वास्तु उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील.

Janmashtami 2024: वैवाहिक कलह मिटावेत म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तु उपाय!
नवरा बायकोचे नाते अतिशय नाजूक. दोन कुटुंबातून आलेल्या दोन व्यक्तींचे परस्परांशी पटणे, पटवून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे यात बराच कालावधी लागतो. तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते. तसे न केल्यास नाते विकोपाला जाते. परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल, तर कितीही भांडणे होवोत पण 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती होते. राधाकृष्णासारखे हे प्रेम अधिक वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर अर्थात २६ ऑगस्ट रोजी रोजी शास्त्रात दिलेले उपाय अवश्य करून पहा.
>> पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सर्वप्रथम पितृदोषाचे निरसन करावे. कुलदेवतेच्या दोषाने कलह होत असेल तर कुलदेवतेच्या दोषाचे निरसन करावे. वास्तुदोषाने कलह होत असेल तर वास्तुदोषाचे निरसन करावे.
>> अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नींमध्ये भांडणे होत असल्यास त्या ग्रहाचे जप, होमहवन, दानधर्म करावे. श्रीगुरुचरित्र, स्वामीचरित्र, कलियुगाचे इच्छितदाता, साईचरित्र, श्री गुरुलिलामृत किंवा सत्पुरुषांचे चरित्र वाचन करावे.
>> भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याने किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असल्यास खालील संकल्प करून एकनाथ महाराजलिखित रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करावे. संकल्प अशा पद्धतीने करावा-
मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांना
समूल परिहारपूर्वक पुन: मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये।।
हा श्लोक म्हणून श्रद्धापूर्व रुक्मिणी स्वयंवर वाचावे. पूर्ण पोथी शक्य नसेल, तर रोज किमान एक अध्याय तरी जरूर वाचावा.
>> दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचे व्रत करावे. सोमवारी संधीकाळात, सोमप्रदोषकाळात आणि शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा साजुकतुपाचा दिवा लावून एक मूठ नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावे.
>> काही वेळा स्त्रीचा काहीही दोष नसताना तिचा पती दुसऱ्याच्या नादी लागून त्यांच्या प्रपंचात काडीमोड घेत असेल, सतत भांडणे होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर स्वामी समर्थांची उपासना करावी. तसेच अशा बाबतीत श्रीकृष्णाची उपासनाही फलदायी ठरते. ''ओम नमो भगवते वासुदेवाय'', हा मंत्र जप किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे. त्याचा निश्चित परिणाम होतो. ही उपासना शीघ्रफलदायी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कारण श्रीकृष्ण हा स्त्रीभोक्ता नसून स्त्रीरक्षणकर्ता आहे.
या सर्व उपासनेबरोरबर नात्यात प्रेम असावे, एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि राधा कृष्णाचा आदर्श ठेवला तर तुमच्या उपासनेला नक्कीच फळ येईन आणि नाते काडीमोड होण्याच्या उंबरठ्यावरून परत येईल!