स्वामी अनेकांचे गुरू; ‘गुरूं’नी कोणाला मानले गुरू? कोणाकडून काय शिकले? वाचा, अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:29 PM2024-07-31T13:29:36+5:302024-07-31T13:32:04+5:30

Datta Guru 24 Guru In Marathi: भारतीय परंपरेत गुरुला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेकांकडून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. जाणून घ्या...

know about 24 guru of dattatreya and its significance in marathi | स्वामी अनेकांचे गुरू; ‘गुरूं’नी कोणाला मानले गुरू? कोणाकडून काय शिकले? वाचा, अन्वयार्थ

स्वामी अनेकांचे गुरू; ‘गुरूं’नी कोणाला मानले गुरू? कोणाकडून काय शिकले? वाचा, अन्वयार्थ

Datta Guru 24 Guru In Marathi: श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तिथेच सुमारे ३०० वर्षांनी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. श्रीनृसिंहसरस्वती यांच्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तगुरुंचा अवतार होता. स्वामी समर्थांची शिष्य परंपरा अद्भूत आणि दिव्य अशीच आहे. स्वामी हेच प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. दत्तात्रयांना गुरुस्थानी मानले जाते. 

भारतीय परंपरेत गुरु लाभणे, याला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. पुढे आपल्या विविध अवतारांमध्येही गुरु-शिष्यांची अलौकिक परंपरा कायम असल्याचे पाहायला मिळते. गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, साई बाबा असतील, यांसह अनेकांचे गुरु हे स्वामी होते. तसेच गजानन महाराज, शंकर महाराज, साई बाबा यांचेही पुढे अनेक शिष्य घडवले. एकूणच गुरु-शिष्य परंपरा मोठी असल्याचे पाहायला मिळते. त्रिगुणात्मक त्रैमूर्ति असलेल्या दत्तगुरुंना २४ गुरु होते, असे सांगितले जाते. 

भारतीय परंपरा या केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक तत्त्वांवर आधारलेल्या नाहीत, तर निसर्ग, आरोग्य यांची सांगड अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला त्यात घातलेली दिसते. भारतीय परंपरेत निर्सगोपासना, निसर्ग पूजन यालाही महत्त्व आहे. सृष्टी आपल्याला अनंत हाताने देत असते. त्याचे ऋण आपल्यावर कायम राहते. हे ऋण फेडण्याचा प्रयत्न किंवा दोन्ही हाताने भरभरून मिळालेल्या गोष्टींविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. दत्तात्रेयांनी याच निसर्गातील नानाविध स्वरुपांना गुरु मानले आहे. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. यातून तसेच भगवान श्रीकृष्ण ह्यांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला व त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली. तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्रीदत्तात्रेयाने २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले. 

दत्तत्रेयांचे २४ गुरु आणि त्याचा अन्वयार्थ

१) पृथ्वी: पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणिमात्रांचे आश्रय स्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते.

२) वायू: वायू दोन प्रकारचे. शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते. म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा. दुसरा वायू बाहेरचा. हा कुठेही आसक्त होत नाही. म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे.

३) आकाश: आकाश सर्वत्र आहे. याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते.

४) जल: जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावत: स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे, कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. 

५) अग्नी: अग्नीला आकार नाही. पूर्णपणे वस्तू जळल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही. अग्नीत तेजस्वीपणा आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण असेपर्यंत देहाचा सदुपयोग करून घ्यावा.

६) सूर्य: सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे. पण त्यात आसक्त होऊ नये.

७) चंद्र: चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीरावस्था असते. आत्मा हा जसाचा तसाच असतो.

८) कपोत पक्षी: कपोत पक्षी व कपोतीण एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली. पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले. तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. योग्यवेळी संसाराचा मोहत्याग करावा.

९) अजगर: आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल, कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे.

१०) समुद्र: समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लित होऊ नये. ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे.

११) पतंग: दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे कुणावरही भाळून, अतिमोहात पडून आपला नाश करू नये. संयम राखावा.

१२) भृंग: निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान-मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे.

१३) गजेंद्र: गजेंद्र म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात. याप्रमाणे कोणत्याही आकर्षणाला भूलू नये.

१४) भ्रमर: सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.

१५) मृग: पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.

१६) मत्स्य: लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसना ताब्यात ठेवावी.

१७) पिंगला: वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही.

१८) कुरर पक्षी: याला टिटवी म्हणतात. एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे, हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून, हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे जाई, तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी. शेवटी तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. टिटवीला सोडून सारे कावळे त्या मासा उचलणार्‍या घारीचा पिच्छा पुरवू लागले. टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, नाहीतर घोर विपत्ती.

१९) बालक: लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान-अपमान, पाप-पुण्य चिंता नसतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे रहावे आणि आनंद भोगावा.

२०) कुमारी कंकण: दोन कंकणे (बांगड्या) एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. अनेक कंकणे असली, तर जास्त आवाज होतो. त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे कलह होऊ शकतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरता ध्यानयोगादी करणार्‍याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे रहावे.

२१) सर्प: सर्प हा समूहाने राहत नाही. ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही. त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे. पण मठ, आश्रम बांधू नये.

२२) शरकार: शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार. हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग साधन इ. करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. 

२३) भ्रमरकीट, कुंभारीणमाशी: भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो. तसेच एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो.

२४) कोळी: हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो. ते जाळे स्वत:मध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामधे सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो.
 

Web Title: know about 24 guru of dattatreya and its significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.