स्वामी महाराजांना नवस कसा करावा? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; ३ नियम अवश्य पाळायला हवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:09 PM2024-09-14T15:09:53+5:302024-09-14T15:16:59+5:30

How To Do Swami Samarth Maharaj Navas: स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलावा? नवस करायची योग्य पद्धत कोणती? कोणत्या गोष्टींचे भान अवश्य ठेवावे? जाणून घ्या...

know about exactly how do navas to shree swami samarth maharaj and should follow this rules all desire will come true | स्वामी महाराजांना नवस कसा करावा? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; ३ नियम अवश्य पाळायला हवेत

स्वामी महाराजांना नवस कसा करावा? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच; ३ नियम अवश्य पाळायला हवेत

How To Do Swami Samarth Maharaj Navas: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या, अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल, तर स्वामींना मनापासून हाक मारली, तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. 

स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत.  स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. अशा स्वामी समर्थ महाराजांना नवस करायचा विचार आहे? स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा?

स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात

आपले कल्याण व्हावे, सुख लाभावे, कुटुंब, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणून आयुष्यभर झटत असतो. प्रयत्न करत असतो. मेहनत घेत असतो. परंतु, अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही, तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते. देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते. अनेकदा नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणींतून सोडवतात, अशी अनेकांची श्रद्ध आहे. अनेकांना तसे अनुभवही आले आहेत. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करावा? नियम काय आहेत? जाणून घेऊया...

स्वामी महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर कसा करावा?

स्वामींना साधेपणा प्रिय आहे. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम-हवन करण्याची गरज नाही, असे म्हटले जाते. एकतर सकाळी आंघोळ, नित्यकर्म करत शूचिर्भूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात पाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा, अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे, हे मागा. संकटे, समस्यांची गाऱ्हाणी मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे, तो बोलून घ्यावा.

स्वामींसमोर नतमस्तक व्हावे

स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदी मध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की, स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे, तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे, ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली, तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे.

या काही गोष्टींचे भान अवश्य ठेवा

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे, ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. 

स्वामीसेवा सुरू ठेवा

स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामीसेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते. तुम्ही काय नवस बोलला आहे? किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे? स्वामींवर किती विश्वास ठेवता? स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का? इतर लोकांना मदत करता का? सदाचारी आहात का? काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुकृपेची साथ लाभू शकेल. 

- स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये. 

- स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. 

- इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा.

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

।।श्री स्वामी समर्थ।।
 

Web Title: know about exactly how do navas to shree swami samarth maharaj and should follow this rules all desire will come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.