Swami Vivekananda: भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेला महत्त्व का आहे? स्वामी विवेकानंदांनी क्षणार्धात पटवून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:17 IST2022-12-09T15:15:27+5:302022-12-09T15:17:05+5:30
भारतीय संस्कृतीत देवी-देवतांच्या पूजनाला महत्त्व आहे. स्वामी विवेकानंदांनी मूर्तीपूजेचे महत्त्व पटवून देताना कोणते उदाहरण दिले? जाणून घ्या...

Swami Vivekananda: भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेला महत्त्व का आहे? स्वामी विवेकानंदांनी क्षणार्धात पटवून दिले
Swami Vivekananda: भारताला हजारो वर्षांची संस्कृती, परंपरा आहे. गेल्या हजारो वर्षांपासून विविधतेने नटलेल्या देशात अनेकविध परंपरा चालत आल्या आहेत. भारतीय संस्कृतीत देवतांच्या पूजनाला महत्त्व आहे. त्यातही मूर्तीपूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात हजारो मंदिरे आहेत. या मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मंदिरांमध्ये विविध प्रकारच्या प्राचीन मूर्त्यांचे पूजन केले जाते. मात्र, अनेकांना मूर्तीपूजन ही संकल्पना पटत नाही. निर्गुण, निराकार परमेश्वराला त्याच रुपात पूजावे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. मात्र, तसेच दुसरीकडे मूर्तीपूजकही मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वामी विवेकानंदांनी मूर्तीपूजेला मानून त्याचे महत्त्वही पटवून दिले आहे. स्वामी विवेकानंदांचा मूर्तीपूजेचे महत्त्व पटवून देणारी गोष्ट सांगितली जाते.
स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्याच आदेशावरून स्वामी विवेकानंद समाजसेवा करण्यासाठी देशाटनाला निघाले. असेच भ्रमंती करताना स्वामी विवेकानंद उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगल सिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य मोठ्या विलासात चालले होते. शिवाय त्यांच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता.
मूर्तीपूजनाबाबत स्वामी विवेकानंदांना विचारले मत
स्वामी विवेकानंदाना पाहून त्याला वाटले की, बोलून चालून हा एक तरुण संन्यासी! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला की, स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे, असा प्रश्न राजाने स्वामीजींना विचारला.
भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का?
राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले की, दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले. रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेहऱ्याकडे एकवार चोरट्या नजरेने पाहिले. स्वामी, असे कसे करता येईल? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत, अशी प्रतिक्रिया दिवाणीजींनी दिली. दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे, असे दिवाणजींना सांगून स्वामी विवेकानंदांनी आपली नजर राजांकडे वळवली.
भगवंतांची पूजा करण्यासाठी एक प्रतीक असावे लागते
राजेसाहेब, त्या चित्रात प्रत्यक्ष आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचारी आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणाऱ्यांची कीव करणे हेही तितकेच अविचाराचे आणि अविवेकी आहे. मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे भक्त जाणतात; भगवंतांची पूजा करण्यासाठी कोणते तरी एक प्रतीक भाविकांसमोर असावे लागते. कारण, निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्य भाविकांना जमणारी गोष्ट नाही. सामान्य भाविकांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्ती हे निर्गुण, निराकार असणाऱ्या भगवंताचे सगुण, साकार स्वरुप आहे. त्यामुळे मूर्तीपूजा ही केवळ प्रारंभीची एक पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो, असा उपदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. स्वामीजींची शिकवण ऐकून राजा अंतर्मुख झाला. त्याची चूक त्याला पटली आणि तो स्वामींसमोर नतमस्तक झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"