समर्थ रामदास स्वामींनी एका रात्रीत रचले ‘मनाचे श्लोक’!; कशी झाली निर्मिती? वाचा, जन्मकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:54 PM2024-03-04T12:54:12+5:302024-03-04T12:54:19+5:30

Dasnavmi 2024: समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आवर्जून म्हटले जातात. पारायणे केली जातात.

know about story of how samarth ramdas swami composed manache shlok in one night | समर्थ रामदास स्वामींनी एका रात्रीत रचले ‘मनाचे श्लोक’!; कशी झाली निर्मिती? वाचा, जन्मकथा

समर्थ रामदास स्वामींनी एका रात्रीत रचले ‘मनाचे श्लोक’!; कशी झाली निर्मिती? वाचा, जन्मकथा

Dasnavmi 2024: माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हाच दिवस दासनवमी म्हणून ओळखला जातो. यंदा २०२४ रोजी ०५ मार्च रोजी दासनवमी आहे. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज ! या नावातच सर्व काही आले. त्यांच्या समग्र चरित्राचे व उपदेशाचे सार वरील पाच शब्दांमध्ये पूर्णपणे सामावलेले आहे, असे मानले जाते. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. अभंग, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा लेखनकृती प्रसिद्ध आहेत. यापैकी मनाचे श्लोक घरोघरी आवर्जून म्हटले जातात.

समर्थ रामदास स्वामी यांचे वाङ्‌मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे. या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे मनाचे श्लोक, असे म्हटले जाते. मनाचे श्लोक मनुष्याला आत्मपरीक्षण करायचा शिकवतात, असे मानले जात. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाची जयंती साजरी केली जाते. समर्थांनी स्वधर्म व स्वराष्ट्राविषयी निस्तेज होऊ लागलेल्या समाजात नवचेतना निर्माण केली. समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे २०५ मनाचे श्लोक सांगितले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका यातून लक्षात येऊ शकतो, असे म्हणतात.

‘मनाचे श्लोक’ रचण्यापूर्वी काय घडले?

‘मनाचे श्लोक’ यांची निर्मिती कशी झाली, याबाबत एक कथा सांगितली जाते. आपले १२ वर्षांचे पायी तीर्थाटन व भारतभ्रमण यात्रा पूर्ण करुन रामदासस्वामी नियोजित कार्यासाठी चाफळच्या खोर्‍यात येऊन राहिले. तेथे आसपासच्या प्रदेशात समर्थांचा शिष्य समुदाय वाढत होता. समर्थ रामदास स्वामींनी तेथे रामोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. स्वामींच्या मनात होते की, रामोत्सवासाठी एक कायमचे ठिकाण असावे. तेथे श्रीराम विराजमान व्हावेत. चाफळच्या गावकर्‍यांनी स्वामींना राम मंदिरासाठी जागा मिळवून दिली. तेथे मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. अंगापूरच्या डोहातून स्वामींना रामाची मूर्ती मिळाली. तिची स्थापना चाफळच्या मंदिरात करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू झाला. रामदासांनी दूरदर्शीपणाने रामाच्या उत्सवाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती.

अरे, तुम्ही कशाला काळजी करता?

रामदासांची लोकप्रियता वाढू लागली. आजुबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले. दरवर्षी ती संख्या वाढतच होती. या भक्तांची व्यवस्था करणे, त्यांच्या भोजनाची राहण्याची व्यवस्था करणे हे सारे भिक्षेवर करावे लागे. त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मदत पाठवली जात असे. मात्र, एकेवर्षी मदत आली नाही. महाराज काहीतरी राजकीय उलाढालीत गुंतलेले असावे, असा विचार करून शिष्यगण आपापल्या कार्याला लागले. आयोजक शिष्य काळजीत होते. आणखी दोन-तीन दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचे ठरले. उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता. अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीची जेवणे झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला. समर्थांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर स्वामी म्हणाले, अरे, तुम्ही कशाला काळजी करता? ज्या रामाचा आपण उत्सव करीत आहोत, तो कैवल्यदाता आहे. मोक्षदाता आहे. मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाही का? आपण व्यर्थ चिंता करू नये. मात्र, आपल्या कामात निष्काळजीपणा, आळस नसावा. आपण जमेल तसा उत्सव करू. रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही.

...आणि मनाचे श्लोक रचले गेले

सर्व शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याणस्वामींना कागद, दौत व लेखणी घेऊन बोलावले. कल्याणस्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली. ‘गणाधीश तो ईश सर्वागुणांचा...’ समर्थ एकामागून एक श्लोक सांगत होते. कल्याणस्वामी ते लिहून घेत होते. दुसर्‍या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या काव्याचा ओघ अखंडपणे सुरू होता. शेवटी, ‘म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी’ ही अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ सांगून समर्थ उठले. कल्याणस्वामींना काही सूचना देऊन आपल्या आवडत्या निसर्गसान्निध्यातील निवांतस्थान असलेल्या डोंगराकडे निघून गेले.

उत्सव थाटात साजरा केला

कल्याणस्वामींनी इतर शिष्यांकडून त्या श्लोकांच्या नकला तयार करून घेतल्या. भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या वाटण्यात आल्या. मनाचे श्लोक लोकांना ऐकवत भिक्षा गोळा करायची असे ठरले. आजही रामदासी ‘मनाचे श्लोक’ म्हणत भिक्षा घेतात व ती मठात जमा करतात. त्यावर्षी हे श्लोक ऐकवत रामदासी महंतांनी, शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य इतर खाद्यसामग्री वगैरे गोळा केली आणि उत्सव थाटात साजरा केला. संकल्प नि:स्वार्थ बुद्धीने केलेला असेल, तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी साहाय्य मिळत जाते. नि:स्पृह कार्यकर्त्यांसाठी सकारात्मकतेचे ‘आत्मनिर्भरते’चे हे उत्तम उदाहरण आहे. या कथेवरून समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे २०५ मनाचे श्लोक सांगितले, असे मानले जाते. ही निर्मितीकथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्वशक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय येतो. स्वामींच्या शब्दांवर पूर्ण निष्ठा असल्याने त्या श्रद्धेतून शिष्यांना आत्मविश्वासाचे बळ आणि कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने कार्य करण्याची प्रेरणा मिळत होती. हे या कथेतून स्पष्ट होते.
 

Web Title: know about story of how samarth ramdas swami composed manache shlok in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.