Navratri 2022: मन स्थिर ठेवून निर्भय करणारी माता चंद्रघंटा हिची उपासना का व कशी करावी, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:39 PM2022-09-28T16:39:17+5:302022-09-28T16:39:47+5:30

Navratri 2022: चंद्रघंटेच्या उपासनेतून साधकाला इह लोक आणि परलोक दोन्हीही ठिकाणी धन्यता प्राप्त होते असे म्हणतात. 

Navratri 2022: Know Why and How to Worship the Fearless Mother Chandraghanta with Steady Mind! | Navratri 2022: मन स्थिर ठेवून निर्भय करणारी माता चंद्रघंटा हिची उपासना का व कशी करावी, जाणून घ्या!

Navratri 2022: मन स्थिर ठेवून निर्भय करणारी माता चंद्रघंटा हिची उपासना का व कशी करावी, जाणून घ्या!

Next

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध तृतीया म्हणजे नवरात्राची तिसरी माळ! आज भगवतीच्या " चंद्रघंटा " रूपाचे आपण पूजन करणार आहोत. शक्ती स्वरूपा व अनेकरूपा असलेली भगवती या रूपामध्ये साधकांचे शाश्वत कल्याण करण्यासाठी  व आसुरी शक्तींचा नाश करण्यासाठी प्रकट झालली आहे.  उत्पत्ती, स्थिती व लय या तीनही गोष्टी जिच्या केवळ संकल्प मात्रे होतात अशी ही सिद्धिदात्री आहे.

*चंद्रघंटा* : --
पिंडजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता ।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेती विश्रुता ।।

भगवती दुर्गेच्या " चंद्रघंटा " श्री विग्रहाचा हा ध्यान मंत्र.तिने मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्थ चंद्र धारण केलेला असल्यामुळे तिला " चंद्रघंटा "असे म्हणतात.  हिचा श्रीविग्रह परमशांती दायक व भक्त कल्याणकारी आहे. शरीराचा रंग स्वर्णासारखा झळाळणारा व तेजस्वी आहे. ही दशभूजा असून तिच्या दहाही हातांमध्ये खड्ग,चामर, तोमर,भिंदिपाल, बाण, त्रिशूल, असिका,( तलवार) चक्र,अस्त्र ,शस्त्र ,पाश आदी विभूषित होत आहेत. ही  सींहा वर स्वार झाली असल्याने  हिला " सिंह वाहिनी "असेही म्हणतात. असूर मर्दना साठी सदा  युद्धोत्सुक आहे. हिने धारण केलेल्या घंटेच्या भयानक ध्वनीने अत्याचारी दानव , दैत्य , असुर आणि राक्षस थर थर कापतात. नवदुर्गेच्या या  श्रीविग्रहाची पूजा  अश्विन शुध्द त्रितीयेस केली जाते. चंद्रघंटेच्या उपासनेतून साधकाला इह लोक आणि परलोक दोन्हीही ठिकाणी धन्यता प्राप्त होते. अशा या ऊर्जा प्रदायक चंद्रघंटेच्या चरणी सश्रध्द नमन........!

साधकाला अलौकिक आनंद देणारी, साधकाच्या मनातील निर्भयता वाढवणारी, साधकाला शंका रहित करणारी व साहस आणि धैर्य निर्माण करून देणारी ही देवता आहे. चंद्रघंटा ही त्रिनेत्रा असून ती दशभुजा आहे. तिची कांती स्वर्णीम व चमकणारी असून ती प्रतिक्षण युद्ध सिद्ध आहे. साधकाने मणिपुर चक्राचे ठिकाणी आपले मन स्थिर करून तिची उपासना केल्यास ही अलौकिक अशा सिद्धी प्राप्त करून देते. 

भगवान शंकर, भगवान विष्णू व बह्म देव यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या ऊर्जा स्वरूपातून चंद्रघंटेचे हे रूप आकारास आलेले आहे. आसुरी शक्तींचा विनाश करण्यासाठी व साधकाला सन्मार्ग प्राप्तीस अग्रेसर करण्यासाठी ही सदैव सिद्ध असते. भगवान शंकरांनी हिला त्रिशूल अर्पण केले. भगवान विष्णूंनी हिला आपले अव्याहत चक्र अर्पण केले. देवराज इंद्रानी तिला घंटा दिली. भगवान सहस्त्ररश्मी सूर्यनारायणाने तिला तेज व असिका म्हणजे तलवार प्रदान केली. अन्य सर्व देवदेवतांनी आपापली अस्त्रे व शस्त्रे देऊन तिला सर्व प्रकारच्या आसुरी शक्तीशी युद्ध करण्यासाठी सक्षम बनविली. अशी ही चंद्रघंटा देवी आज तिच्या पूजनाचा मंगल दिवस आहे.

आपण बघितले की पौराणिक कथेनुसार ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्या ऊर्जेतून या चंद्रघंटा देवीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ती अ-प्रतिहत, अ-व्याहत व शाश्वत ऊर्जास्वरूप व ऊर्जा देणारी देवता आहे.  ऊर्जा कधीही नष्ट केली जात नाही फार तर आपण तिचे स्वरूप बदलू शकतो. Energy can not be destroyed, u can change the form of energy. असा सिद्धांत  आजच्या विज्ञानानेहि मान्य केलेला आहे. भगवतीचे चंद्रघंटा रूप एका शाश्‍वत ऊर्जेचे प्रतीक आहे. " उत्पत्ती स्थिती व लय " या ब्रह्मांडाच्या तीनही अवस्थांमध्ये या चंद्रघंटा देवीची ऊर्जा कार्य करीत असते. श्री. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे....

उपजे ते नासे । नासले पुनरपि दिसे ।
हे घटिका यंत्र जैसे । परीभ्रमे गा ।।

एका अर्थाने विसर्जन हेही एक नवे सृजनच असते. ब्रह्माण्डाच्या विसर्जनानंतर " नवसृजना " च्या प्रक्रियेची मूलभूत ऊर्जा म्हणजे चंद्रघंटा......! त्यामुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती व लय या तीनही गोष्टी या चंद्रघंटा देवीच्या शक्ती प्रसारण, प्रक्षेपण व आवरण यातूनच होत असतात. ऊर्जा व चेतना स्वरूप असल्यामुळे भगवती चंद्रघंटा ही सर्व- तंत्र- स्वतंत्र आहे. साधकाने शक्तीच्या प्राप्तीसाठी स्व-तंत्र असणे गरजेचे आहे. भारतीय अध्यात्म शास्त्राने आत्म्यावरील देहाचे बंधन सुद्धा झुगारले आहे. त्यामुळे भारतीय अध्यात्मशास्त्रातिल साधकाने कोणत्याही मायिक बंधनात राहू नये हे ओघानेच आले. सर्व प्रकारची बाह्य बंधने झुगारून आत्मस्वरुपी प्रतिष्ठित होऊन साधकाने त्या दिव्य शक्ती पाताची अनुभूती घेणे आवश्यक असते. शक्ती स्वरूपा भगवती चंद्रघंटा आपल्या अशा अलौकिक शक्तीच्या प्रक्षेपणाने साधकात शक्तिपात घडवून आणीत असते. ही शक्ती साधकांच्या शरीरात मुलाधारापाशी साडेतीन वेटोळ्यात  सुप्त अवस्थेत असते. श्री ज्ञानेश्वर माउलींनी तिलाच  " कुंडलिनी आंबा " असे म्हंटले आहे. हाच श्री माऊलींचा " महायोग " होय. 

नागिणीची पिले । कुंकूमे नाहले ।
वळण घेउन आले । सेजे जैसे ।। 
ते कुंडलिनी जगदंबा । 
जे चैतन्य चक्रवर्ती ची शोभा ।
जिया विश्व बीजाचिया कोंभा । 
साऊली केली ।।
ऐके शक्तीचे तेज लोपे । तेथ देहीचे रूप हारपे । 
मग डोळियांची माजि लपे । जगाची या ।।

असे तिचे अलौकिक वर्णन ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर माऊली करतात. या कुंडलिनी जागृती नंतर म्हणजेच शक्ती पाताची अनुभूती आल्यानंतर साधकाला अलौकिक अशा दिव्य सिद्धी प्राप्त होतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात....
मग समुद्रा पैलाडी देखे । 
स्वर्गीचा आलोचु आईके।
मनोगत वोळखे  । मुंगीचिये ।।

अशा प्रकारची शक्ती जागृती प्राप्त झाल्यानंतर तो साधक " विचरे विश्व होऊनी विश्वामाजी " या अवस्थेत येतो. अशा प्रकारच्या शक्तीशी एकदा अनुभूती आल्यानंतर विश्वाचे आर्त त्याच्या मनी प्रकाशते व अवघी काया ब्रह्मरुप होते. विश्वबन्धु स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातील एक अतिशय प्रेरक प्रसंग बघीतल्यावर आपणास या शक्तीच्या प्रकटी करणाची व संचरणाची काही कल्पना येऊ शकेल.  श्री स्वामिजी काश्मिरातील क्षीर भवानीच्या पवित्र निर्झर तीरी येऊन उग्र तपस्यामग्न होते. रोज एक मण दुधाची खीर आणि भरपूर प्रमाणात बदाम, मेवामिठाई चा ते जगत्जननी ला नैवेद्य दाखवू लागले. अशाप्रकारे शास्त्र विधी नुसार पूजा करत असतांना एके दिवशी होमाग्नी समोर बसून  स्वामी विवेकानंद महामाये च्या ध्यानात निमग्न असताना त्यांच्या मनात विचार आला.......
" मुसलमानांनी हे मंदिर भग्न केले त्यावेळी हिंदू लोक आपल्या बाहुबलाने त्याचे निवारण करू शकले नाहीत, जर त्या समयी मी असतो तर प्रसंगी प्राणपणास लावून मी या जगदंबेच्या मंदिराचे रक्षण केले असते."  स्वामीजींच्या मनात असा विचार येताच अचानक एक देववाणी झाली. विस्मय विमूढ स्वामीजींनी कान टवकारून ती देववाणी ऐकली. चराचरात व्याप्त असलेली ती जगत्जननी सहस्त्र मुखाने स्वामीजींची सस्नेह निर्भत्सना करून त्यांना उद्देशून म्हणत होती........

" तू माझे रक्षण करणार की मी तुझे रक्षण करणार? माझ्या एका भृकुटी भंगाने या ब्रम्हांडात हजार प्रलय होतात व हजार ब्रम्हांड निर्माण होतात. तू मला नवजीवन देणार? माझी तशी इच्छाच असेल तर मी याच क्षणी एक सात मजली सोन्याचे मंदिर निर्माण करू शकणार नाही ? माझ्या इच्छेनेच हे मंदिर असे भग्नावस्थेत पडलेले आहे. मी माझ्या इच्छाशक्तीने या ब्रह्मांडाचे सर्जन व विसर्जन करत असते. मीच चराचरात व्याप्त असून संपूर्ण ब्रम्हांडाची चित् शक्तीही मीच आहे." भगवतीचा हा दिव्य संदेश ऐकल्यानंतर स्वामीजींना एका अत्युच्च भावावस्तेत तिच्या रूपाचं वर्णन करणाऱ्या " काली द मदर " या कवितेचे स्फुरण झाले.त्यातील काही कडवे आपल्या  आनंदासाठी येथे देत आहे. याच्या खालील मराठी कविता प्राध्यापक ब.ग. खापर्डे यांनी केलेला स्वैर भावानुवाद आहे.

KALI THE MOTHER

Reveals on every side
 A thousand thousand shades
 of death begrrimmed and black
Scattering plagues and sorrow
 Dancing mad with joy
 Come mother come !
 For terror is thy name !
 Death is in thy breath
 And every shaking step
 Destroys a world for e'er
 Thou time, the all destroyer !
 Come, O mother, come !
Who dares misery love,
And hug the form of death
Dance in Destruction's dance
To him the mother comes.

ये, आई, ये ! नाम तुझे कराली
प्रश्वास काली ! तव मृत्यु शाली ।
एकेक हा कंपित पाद घात
एका जगा शाश्वत नाश देत ।।
तू कालिके सर्व विनाश कर्त्री  !
ये आई ये ज्यासी असेची छाती
दैन्यावरी प्रेम करावयाची
मृत्यूस आलिंगन द्यावयाची ।।
नाशार्थ जे भीषण नृत्य चाले
त्या माजि ज्याने  सह नृत्य केले ।
त्याला,-- अशा दुर्लभ भाग्यवंता
भेटेल ही भीषण कालीमाता।। 

अशा प्रकारे या चराचरात चैतन्य व ऊर्जा स्वरूपात विद्यमान असलेल्या भगवतीचे चंद्रघंटा  स्वरुपात शक्तीचे आवाहन,संगोपन, संवर्धन व देव, देश, धर्म हितास्तव वापर करणे ही आजची केवळ गरज नसुन अनिवार्यता आहे. याप्रमाणे स्वात्मोद्धारा सह लोककल्याणासाठी या शक्ती संचयाचा जागर करण्यासाठी आज आपण कटिबद्ध व या शक्तीचा वापर करण्यासाठी सिद्ध होऊ या व आनंदाने म्हणू या.......उदयोस्तु जगदंब उदयोस्तु .......

अक्षर योगी :  94 222 84 666 /  79 72 00 28 70

Web Title: Navratri 2022: Know Why and How to Worship the Fearless Mother Chandraghanta with Steady Mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.