आजपासून पौष मास सुरू झाला; शुभकार्यासाठी हा महिना योग्य नसूनही महत्त्वाचा का ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:12 AM2022-01-03T11:12:59+5:302022-01-03T11:13:17+5:30

पौष मासात शुभकार्य होत नसल्याने त्याला भाकड मास असेही म्हणतात. पण का? ते जाणून घेऊ .

Poush Mass started from today; Find out why this month isn't important for good occasion, but still it is important! | आजपासून पौष मास सुरू झाला; शुभकार्यासाठी हा महिना योग्य नसूनही महत्त्वाचा का ते जाणून घ्या!

आजपासून पौष मास सुरू झाला; शुभकार्यासाठी हा महिना योग्य नसूनही महत्त्वाचा का ते जाणून घ्या!

googlenewsNext

तिळगुळाचा गोडवा आनि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष मास हा आसेतुहिमाचल अखिल भारतवर्षाला हवाहवासा वाटतो. तो विशेषत्वाने त्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणामुळे! या मासाची अधिक माहिती आणि महती जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांच्या लेखणीतून. 

हा एक महत्त्वाचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला पूर्वापार `भाकडमास' म्हटले जाते. या मासातील पौर्णिमेच्या आधी अथवा नंतर पुष्प नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'पौष' हे नाव मिळाले. पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे हे नक्षत्र विरक्ती वाढवणारे आहे. `गुरु-पुष्य' योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे. या योगावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, असे असले तरी पुष्य नक्षत्र विवाहासाठी योग्य नसल्याचे मुहुर्तशास्त्राने मत व्यक्त केले आहे.त्याही पलीकडे भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

पौष पौर्णिमेला 'राका' हे विशेष नाव आहे. कविवर्य यशवंत यांनी 'संक्रांतीचा दिवस आठवतो का तुला? 'त्वा जेधवा फुलविलीस मम भाग्य राका' असा या पौर्णिमेचा उल्लेख करून तिला रमणीय केले आहे. 'तैष' आणि `सहस्य' अशी याची आणखी दोन नावे आहेत. ऋतुंमधील हेमंत ऋतुचा हा दुसरा मास! या महिन्यात उत्तरायण असते. याव्यतिरिक्त माघस्नान आणि शाकंभरी पौर्णिमा या दोन्ही महत्त्वाच्या तिथीविशेषांमुळे पौष मास आपले महत्त्व राखून ठेवतो. यातही मकरसंक्रांतीचा काल हा दानधर्म, व्रते, श्राद्धकर्मे, तीर्थस्नान आदी धर्मकार्यासाठी प्रशस्त असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेसारखेच मकरसंक्रांतीला केल्या जाणाऱ्या धर्मकृत्यांना त्यातही दानकर्मांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.  

मकरसंक्रांतीच्या दिवशी बंगाल प्रांतात एक लोकोत्सव केला जातो. या दिवशी स्त्रिया आपापल्या घरच्या धान्याच्या कणग्यांना गवताची पेंढी बांधतात. ही पेंढी बांधत असताना त्या बावन्नपौटी हा शब्द सतत उच्चारत असतात. पौटी म्हणजे पटीने. कणगीतील धान्य बावन्न पटीने वाढो, असा त्याचा अर्थ! पुढील वर्षाच्या धनधान्यसमृद्धीसाठी हा विधी केला जातो. तर आंध्र प्रदेशातील 'गमल्ल' जातीमध्ये संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरी पूर्वजांची पूजा केली जाते. 

असे असले, तरी पौष महिन्यात मकरसंक्रांतीच्या सणामुळे इतर व्रते महत्त्वाची नसल्यामुळे अनेकांना ती माहितदेखील नाहीत. गुजरातमध्ये पौष पौर्णिमेला लहान बहिणी आपल्या भावासाठी दिवसभराचा उपास करतात. रात्री चंद्रपूजा करून तो उपास सोडतात, म्हणून या पौर्णिमेला `भगिनी पौर्णिमा' म्हणातात. तर आदिवासींच्या मुंडा जमातीत पौष पौर्णिमेला खळ्यातून धान्य आणून ते घरच्या कोटारात भरतात. त्या धान्योत्सवाला `मगे परब' असे म्हणतात. परब म्हणजे पूर्व! तसेच परब म्हणजे पर्व. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील कर्तापुरुष उपवास करतो. पौर्णिमेला स्नान करून तो प्रथम पितरांची पूजा करतो. नंतर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाटी त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. एवढे झाल्यावर घरातील सर्व मंडळी नवीन तांदळाचे पोहे, गूळ, भात, भाकरी अशा पदार्थांचे सहभोजन करतात. 

याशिवायही तुमच्याकडे पौष मासासंबंधी काही महत्त्वाची माहिती असेल तर जरूर शेअर करा!

Web Title: Poush Mass started from today; Find out why this month isn't important for good occasion, but still it is important!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.