Sade Sati 2025: मेष राशीला साडेसाती सुरु होणार म्हणून खरंच घाबरायचे कारण आहे का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:47 IST2025-01-15T13:47:19+5:302025-01-15T13:47:52+5:30
Sade Sati 2025: साडेसाती या शब्दाने लोकांची घाबरगुंडी उडते, ती सुरु झाली काय की संपली काय, आपल्या हातात काय आणि शनीच्या हातात काय हे सांगणारा लेख!

Sade Sati 2025: मेष राशीला साडेसाती सुरु होणार म्हणून खरंच घाबरायचे कारण आहे का? जाणून घ्या!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
गेले काही दिवस “शनी आता मीन राशीत जाणार, मग मेष राशीला साडेसाती...” असा बागुलबुवा करणारे अनेक व्हिडीओ येत आहेत...सध्या तो कुंभेत आहे मग मीन राशीत आणि मग मेषेत असे तो आपले भ्रमण करताच राहणार . त्यात काय ? मेष राशीच्या लोकांनी अजिबात घाबरू नका खरतर ज्या ज्या गोष्टींना आपण घाबरतो त्या गोष्टी कधीही घडतच नाहीत हे येतंय का लक्षात? बिचारे शनिदेव काहीच करणार नाहीत. उलट ह्या भीतीमुळे तुम्ही आजारी पडाल आणि खापर शनिदेवाच्या नावाने फोडाल; त्यापेक्षा शांत राहा आणि साडेसातीच्या भीतीने घाबरू नका.
त्या शनीला इतके बदनाम करून ठेवले आहे की विचारू नका. अभ्यास केलात तर पेपर चांगला जाणार, पण नाही केलात तर नापास होणार किंवा मार्क कमी मिळणार हे जितके सोपे गणित आहे तीच शनीची भूमिका आहे! अगदी जन्मल्यापासून तो तुमच्या सोबत आहे. गुरु आंजारून गोंजारून सांगतो बाबांनो नीट वागा, पण त्याचे कोण ऐकतोय ...म्हणून मग शनीला यावे लागते, तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी! प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट हे असतेच पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते? कुणालाही नाही, ही खरी गोम आहे. ते नियंत्रणात आणायचे काम साडेसाती करते.
मेष राशीची साडेसाती :
२९ मार्च २०२५ रोजी मेष राशीला साडेसाती (Mesh Rashi Sade Sati 2025)सुरु होणार ती २०३२ मध्ये संपणार. शनी मेष राशीत निचीचा होणार मग अधे मध्ये तो वक्री पण होणार . होऊदे, त्यात काय, अहो व्हायलाच लागते त्याला, कारण त्याला आपल्याला सरळ करायचे असते तेही अगदी सुतासारखे! कायदा, अनुशासन सर्वांना सारखा, हेच दाखवण्यासाठी साडेसाती असते.
तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही . मेष राशी ही प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणार, तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनीसुद्धा विराजमान असणार. हा शनी कसा आहे, त्यावर सुद्धा अनेक निकष अवलंबून असतात. शनी मंगळ षष्ठ भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ठ भावात आजरपण देणार!
साडेसाती आणि ग्रहमान :
ज्योतिष हे अनुभव देणारे थोडक्यात प्रचीती देणारे शास्त्र आहे. राहूची दशा ज्यांची चालू आहे किंवा भोगून झाली आहे त्यांना विचारा, आयुष्यातील १८ वर्ष कशी गेली ते. स्वतः अनुभवल्याशिवाय ग्रह आपल्या पत्रिकेत काय फलीत देतात ते सांगता येणार नाही. तूळ लग्नाला शनी योगकारक, म्हणजे तो तुमच्या चुका पदरात घालेल असे नाही हे समजून घ्या. कुठल्याही राशीचा, जातीचा, धर्माचा माणूस असुदेत. चूक झाली की केस शनीकडे जाणारच जाणार. गुरु व्यय भावात आहे म्हणजे लगेच विमानात बसणार का तुम्ही अमेरिकेला जायला? असे नाही! कदाचित दवाखान्याच्या फेऱ्यासुद्धा होतील. असे आहे सर्व. हा अभ्यास खूप सखोल आहे.
आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे . माझे कोण वाईट करणार? मी बेताल वागणार . ह्याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे. शनी राहू युतीसुद्धा होते आहे, एप्रिल- मे दोन महिने. बघा आपापल्या पत्रिका तपासा आणि शोधा मीन राशी कुठे आहे? आणि तिथे होणारी ही युती काय फळ देईल? आपली कर्म आपल्यालाच सांभाळायची आहेत ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर कुणीच आपले काहीच वाईट करणार नाही. ताप आला की आपण औषध घेतो ना, अगदी तसेच साडेसाती पनवती जे काही असो अथवा नसो . रोज चार वेळा जेवतो न आपण मग निदान एकदा तरी देवाचे नाव घ्या की!
साडेसाती आणि साधना :
मी साधना काय करू?असा प्रश्न सगळे विचारतात, पण सांगितले की करतात किती आणि तेही श्रद्धेने हे महत्वाचे आहे . आपल्या रुचा , वेद , स्तोत्र ह्यात प्रचंड ताकद आहे. श्रद्धेने , मनापासून म्हटली तर ती अनुभव देण्यास समर्थ आहेत हे नक्की . पण आपण सगळे उरकून टाकतो आणि म्हणूनच आपल्याला हवे ते फळ मिळत नाही. मनाची शांतता हरवून बसलेल्या ह्या आजच्या कलियुगात साधनेची किती आवश्यकता आहे हे मी वेगळे सांगायला नको. आपल्या देशात येऊन पाश्चिमात्य लोक योग, साधना , मेडीटेशन शिकत आहेत, त्यावर Ph.D. करत आहेत, पण आम्हाला साधे सूर्याला अर्घ्य घालायला सांगा, तेही जमत नाही.
शनी मेषेत जाऊदे, नाही तर सिंहेत; ह्या सर्वाला कोण घाबरेल? ज्या व्यक्तीला आपण काय काय केले आहे ते माहित आहे तो घाबरेल. कर नाही त्याला डर कशाला? चुका होतात माणसाकडून पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे. मुळात चुका मोठ्या मानाने स्वीकारता आल्या पाहिजेत .
साडेसातीच्या काळात घ्यायची काळजी :
आजूबाजूला इतके विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते, जेव्हा शनी कडे ह्यांची केस जाईल, तेव्हा काय होईल? शनी विकलांग करून ठेवतो, शरीराने आणि मनाने सुद्धा! शनीकडे पत्रिकेतील १०, ११ भाव आहेत. म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग. शनी वाताचा कारक, त्यामुळे हाडे सुद्धा त्याच्या कक्षेत येतात. कधी काय होईल, सांगता येत नाही! शनीसमोर कुणाचे चालणार म्हणा! तिथे ओळख चालत नाही आणि पैसा तर अजिबात काम करणार नाही उलट शिक्षा वाढेल. शनी कुठल्याही राशीत असो, त्याचे साम्राज्य आणि अस्तित्व दोन्ही अबाधित आहे. आयुष्याच्या संध्याकाळी काही नको वाटते . नुसते शांत बसावे आणि नेमकी हीच शांतता आपल्या कर्माने घालवू शकतो. तारुण्यपणी केलेल्या चुकांचे परिमार्जन वृद्धपकाळी शनी करवून घेऊ शकतो, त्यामुळे वेळीच सावध व्हा, कर्म चांगले ठेवा, वागणूक चांगली ठेवा, हात आकाशाला लागले तरी पाय जमिनीवर असू द्या!
आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना, जसे की नोकरी मिळेल का? मुलाचा विवाह कधी होईल ? व्हिसा अडकला आहे , जागा विकली जात नाही अशा अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात, म्हणजेच आपल्या सद्गुरुंवर आपला विश्वास नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा का . आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे. ते म्हणतील रोज इतकी फुले वाहते. ही आरती, ती आरती करते आणि पुन्हा चिंता करते मग मी कशाला आहे? एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले की ते सांगतील ते, जे करतील ते आपल्या भल्यासाठी असेल, ह्यावर आपली श्रद्धा हवीच हवी .
शनी ह्या राशीत की त्या राशीत करत निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा हनुमान चालीसा म्हणा, अगदी वेळ मिळेल तेव्हा म्हणा! चिंता सोडा, आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. पोळ्या करताना सुद्धा श्रीराम जयराम आपण म्हणून शकतो. इन्स्टा, सोशल मिडिया आपल्याला गुरूंपासून दूर नेणारा राहू आहे .त्याला ओळखा आणि वेळीच दूर ठेवा . पूर्वी कुठे होते हे सर्व? जीवन किती वेगळे होते, सगळे कुटुंब एकत्र जेवायचे, हसायचे, खेळायचे. मनात आणले तर सर्व पूर्वीसारखे करू शकतो आपण. असो आजचा विषय शनी आहे.
शनी आणि इतर राशी :
सिंह राशीला शनी आठवा येत आहे तेव्हा त्यांनी आता आवाज बंद ठेवा. मी असा आणि मी तसा खूप झाले, नाहीतर भोगा मग शिक्षा. अनेकदा उत्तम कर्म करतो आपण, पण त्याचाही आपल्याला अहं येतो. काही चांगले काम केले तर करा आणि सद्गुरुचरणी ठेवा . मी सुद्धा लेखन करते आणि महाराजांच्या चरणाशी ठेवते आणि पुढील लेखाकडे वळते. मागे वळून बघायचे नाही म्हणजे अहं येणार नाही . अगदी तसेच रात्री झोपताना सगळे दिवसभर मिळवले ते त्यांच्याच चरणी ठेवा म्हणजे आपल्याकडे अहंकार करायला काही उरणारच नाही .
ग्रहांना त्यांचे काम करुदे आपण आपले करुया . साधना , उपासना , योग , प्राणायम , दानधर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसऱ्याला आनंद देता नाही आला तर निदान दुःख तरी देऊ नका . चांगले बोलता आले नाही तर वाईट बोलू पसरवू नका . इर्षा , असूया , मत्सर , द्वेष आपल्या मनाला पर्यायाने शरीराला लागलेली कीड आहे ती वेळीच झटकून टाका . द्वेष करून काय मिळणार? जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे. आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे रोज त्रयस्थपणे बघावे, खूप काही शिकायला मिळेल ...
साडेसातीचे उग्र रूप आणि कर्म :
शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देत असतोच . एका क्षणात आयुष्य बदलते , होत्याचे नव्हते होते , सकाळी भेटलेला माणूस दुपारी ह्या जगातच नसतो , विस्मयचकित , अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते . शनी जागेवर बसवून ठेवतो . अपंगत्व हे मन आणि शरीर पोखरते . आपल्या हातात काहीच नाही , ना कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे. आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही .
ओम शं शनैश्चराय नमः!
संपर्क : 8104639230